नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजने अंतर्गत देशात सुमारे 50 हजार आरोग्य व कल्याण केंद्रे कार्यरत आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्यावतीने आज देण्यात आली. येत्या डिसेंबर 2022 पर्यंत अशी एकूण दीड लाख केंद्रे देशभरात सुरू करण्याचे मंत्रालयाचे उद्दीष्ठ आहे.
घरा जवळ प्राथमिक आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून ही केंद्रे सुरू करण्यात आली असून त्याचा आत्तापर्यंत सुमारे 28 कोटी लोकांनी लाभ घेतला आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे. राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने ही केंद्रे सुरू केली जात आहेत.
त्या केंद्रामधील कामकाजाने प्रत्येक पातळीवर मॉनिटरिंग केले जात आहे अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी दिली.लोकांना अडचणीच्या काळात या केंद्रांद्वारे चांगली आरोग्य सेवा पुरवल्याबद्दल त्यांनी आशा कर्मचारी व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभारही मानले आहेत.
कोविडच्या प्रादुर्भावाच्या काळातही या केंद्रांनी मोठे योगदान दिले आहे असे त्यांनी म्हटले आहे. या आरोग्य केंद्रांचा ज्या रूग्णांनी आत्तापर्यंत लाभ घेतला त्यातील निम्मी लोकसंख्या महिलांची आहे असेही त्यांनी नमूद केले आहे. या केंद्रांमध्ये किती जणांवर काय काय उपचार केले गेले त्याचीही माहिती आरोग्य मंत्र्यांनी एका निवेदनात दिली आहे.