नवी दिल्ली – जानेवारीमध्ये होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram mandir) उद्घाटन सोहळ्यापूर्वी अयोध्येला उत्तर प्रदेशचे पहिले ‘सौर शहर’ (Solar City) म्हणून विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
22 जानेवारी रोजी होणाऱ्या ‘प्राण प्रतिष्ठा’ समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि देशभरातील सुमारे 10,000 मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे, असे राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर अयोध्येला सोलर सिटी म्हणून विकसित केले जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत सुरू असलेल्या कामावर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून आहेत. कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, “अयोध्या ही सूर्यवंशाची राजधानी आहे. त्यामुळे येथे वीज इतर स्त्रोतांकडून नाही तर अक्षय सौरऊर्जेतून येईल.” (Yogi adityanath)
या योजनेत सरयू नदीच्या किनाऱ्यावर एक सोलर पार्क विकसित करणे, सौरऊर्जेवर चालणाऱ्या बोटी उपलब्ध करून देणे, सौर पथदिवे बसवणे, सार्वजनिक वाहतुकीमध्ये सौरऊर्जेच्या स्त्रोतांचा अवलंब करणे, सार्वजनिक ठिकाणी मोबाइल चार्जिंग पॉइंट्स यांसारख्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या सुविधा पुरवणे तसेच विद्युतीकरणाचा समावेश आहे. सरकारी इमारतींमध्ये सौरऊर्जा वापरणे आणि घरगुती वापरासाठी सौरऊर्जेचा स्त्रोत वाढवणे अशी कामे केली जात आहेत. हा प्रकल्प उत्तर प्रदेशच्या महत्त्वाकांक्षी सौर ऊर्जा धोरण 2022 चा एक भाग आहे. योजनेचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे 16 महानगरपालिका आणि नोएडा यांना “सौर शहरे” म्हणून विकसित करणे हा आहे. अयोध्येत सुरू असलेले बहुतांश प्रकल्प जानेवारीपर्यंत पूर्ण होतील.(yogi sarkar)
या कामात एकूण 2.5 मेगावॅट क्षमतेच्या 117 सरकारी इमारतींच्या छतावर सौर पॅनेल बसवणे समाविष्ट आहे. यामध्ये आरएमएल अवध विद्यापीठात 250 किलोवॅट क्षमतेचे सौर पॅनेल, कृषी विद्यापीठात 155 किलोवॅटचे पॅनेल, जिल्हा न्यायालयात 100 किलोवॅट क्षमतेचे पॅनेल, राम कथा संग्रहालयात 58 किलोवॅटचे पॅनेल आणि विविध सरकारी माध्यमिक शाळांमध्ये 50 किलोवॅट क्षमतेचे पॅनेल यांचा समावेश आहे.