नवी दिल्ली: अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रकरणावर काम करणाऱ्या मध्यस्थी समितीची आज डेडलाईन संपणार आहे. आज मध्यस्थी समिती आपला अहवाल बंद लिफाफ्यात न्यायालयात सादर करणार आहे. त्यानंतर उद्यापासून प्रकरणाची पुढील सुनावणी सुरू होणार आहे. मध्यस्थता समितीला 31 जुलैपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर या प्रकरणात दररोज सुनावणी घ्यायची का, याबद्दलचा निर्णय न्यायालय उद्या देणार आहे.
अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणात चर्चेतून तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय मध्यस्थता समिती स्थापन केली. दरम्यान, आज उत्तरप्रदेश सदनमध्ये एक बैठक होणार आहे. या बैठकीत चर्चा करून या मुद्यावर तोडगा काढता येणार का यासाठीचा हा शेवटचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची उद्या सुनावणी होणार आहे.