नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रकरणावर मध्यस्थी समितीने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. या प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. मध्यस्थी समितीला 31 जुलैपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. हा अहवाल मध्यस्थी समितीने सादर केला आहे. अयोध्या प्रकरणाची रोज सुनावणी घ्यायची की नाही यावर आज न्यायालय निर्णय देणार आहे. आज दुपारी 2 वाजता या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणात चर्चेतून तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय मध्यस्थता समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल तयार करताना दोन्ही पक्षकारांमध्ये फारसा बदल जाणवला नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, वादग्रस्त जमीन प्रकरणात न्यायालयाने माजी न्यायाधीश एफ. एम. आय. कलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय मध्यस्थी समिती स्थापन केली होती. या समितीने आतापर्यंतच्या झालेल्या कामाची माहिती न्यायालयाला दिली. यानंतर पाच न्यायमूर्तींचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने 2 ऑगस्टची तारीख निश्चित केली होती. या खंडपीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह न्यायमूर्ती एस. एस. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस. ए. नजीर यांचा समावेश आहे.