6 महिन्यांतील अपघातांची आकडेवारी
दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांची संख्या सर्वाधिक
गतवर्षीच्या तुलनेत अपघात घटले, पण मृत्यू वाढले
पुणे – शहरात वाढत्या वाहनसंख्येसह अपघातांचे प्रमाणही त्याच वेगाने वाढत आहे. मागील सहा महिन्यांत तब्बल 95 प्राणांतिक अपघात घडले. यात 100 जणांना प्राण गमवावे लागले असून यात दुचाकीचालक आणि पादचाऱ्यांचा आकडा मोठा आहे. विशेष म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत अपघातांची संख्या घटूनही मृत्यूचे प्रमाण दखल घेण्याजोगे आहे. यातील बहुतांश अपघातांना रस्त्यांची दुरवस्था कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.
वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार, मागील सहा महिन्यांतील आकडे पाहता, गतवर्षीच्या तुलनेत अपघातांमध्ये घट झाली आहे. मागील वर्षी 123 प्राणांतिक अपघातामध्ये 130 जणांचा मृत्यू झाला होता. शहरामध्ये प्रामुख्याने ‘निष्काळजीपणा’, “ओव्हर स्पीडिंग’, “नियमांचे पालन न करता वाहन चालविणे’, “रस्त्यांची दुरवस्था’ आदी कारणांमुळे अपघात घडतात. अपघातांना अनेकदा वाहनचालक जबाबदार असले, तरी पादचारी यामध्ये नाहक भरडले जातात.
मागील काही महिन्यांमध्ये अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. ही संख्या शुन्यावर येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, याबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत. अपघातामध्ये एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये, असा वाहतूक शाखेचा मानस आहे.
– पंकज देशमुख, उपायुक्त, वाहतूक शाखा