शिक्रापूर-ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी सध्या सर्पदंशाचे प्रमाण वाढलेले दिसते; परंतु सर्पांबाबत पुरेशी काळजी घेतली जात नसल्यामुळे सर्पदंश होण्याचे प्रकार घडत आहेत. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस योग्य उपचार मिळाल्यास जीवाला असलेला धोका टळू शकतो. अन्यथा व्यक्ती दगावू शकतो त्यामुळे ग्रामीण भागात सर्पदंशाबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.
सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे बिळांमध्ये पाणी गेल्यामुळे अनेक सर्प जमिनीवर येतात, तसेच पाऊस गेल्यानंतर जमिनीचे तापमान वाढले गेल्याने अनेक सर्प जमिनीवर इकडे तिकडे सरपटत थंड व अंधाऱ्या जागेच्या शोधात घराजवळ आल्याचे दिसून येतात. अशावेळी नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे असते. अलीकडील काळामध्ये नागरिकांनी अनेक ठिकाणची जंगले नष्ट करत कित्येक ठिकाणचे डोंगर सपाट केलेले आहेत. त्यामुळे सर्पांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वाढत्या लोकवस्तीमुळे खाणे व पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे सर्प मनुष्यवस्तीत येण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या सर्वत्रचे सर्प पकडण्यासाठी सर्पमित्र कार्यरत झालेले असताना, कित्येकदा नागरिक सर्प लहान आहे, असे समजून त्या सर्पाला माहितीच्या अभावात मारण्याचा अथवा पकडण्याचा प्रयत्न करतात. सर्प विषारी की बिनविषारी हे समजू शकत नसल्यामुळे सुद्धा अनेकांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामीण भागात जनजागृती झाल्यास नागरिकांना होणारे धोके टळून सर्पांचे अस्तित्व राहण्यास मोठी मदत होणार आहे.
- लहान सापांमध्ये जेवढे विष असते तेवढेच विष मोठ्या सापांमध्ये असते. त्यामुळे नागरिकांनी कोठेही लहान अथवा मोठा सर्प दिसल्यास त्याचाशी खेळण्याचा प्रयत्न करू नये. ग्रामीण भागातील नागरिकांनी रात्रीच्या वेळेस बाहेर पडताना काळजी घ्यावी तसेच कोठेही सर्प आढळून आल्यास जवळील सर्पमित्रांना बोलवावे.
-गणेश टिळेकर, सर्पमित्र - एखाद्या नागरिकाला सर्पदंश झाल्यास त्याचे पालक स्वतः घाबरून जातात; परंतु पालकांनी घाबरून न जाता सर्पदंश झालेल्या व्यक्तीस धीर देत जवळील रुग्णालयात ताताडीने हलवावे.
-डॉ. वैजिनाथ काशीद, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय शिक्रापूर