नगर -विमानातून फिरताना, लाल दिव्याच्या गाडीतून गावभर फिरता, मंत्री आहात मग जबाबदारी देखील मंत्र्यांची आहे. जालना, नांदेड आणि आता नगरमध्ये जे झाले त्या अधिकारी नाही तर मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे. ही गृहमंत्र्यांची जबाबदारी असून ते आता पळ काढू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्यांची विचारपूस करण्यासाठी सुळे त्यांच्या निवासस्थानी आल्या आल्या. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होत्या. राज्यात काय चालले आहे, लोकशाही राहिलीच नाही. सामाजिक काम करणाऱ्यांवर असे हल्ले होत असतील तर कायदा व पोलीस गेले कोठे? गृहमंत्र्यांवर ही जबाबदारी असून त्यांनी राजीनामा द्यावा अथवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या, अशी मागणी करून खा. सुळे म्हणाल्या की, कुलकर्णी यांच्यावरील हल्ल्याची चौकशी करून आरोपींना तातडीने अटक झाली पाहिजे. तसेच त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
या हल्लेखोरांच्या मागे कोण आहे. ते तपासले पाहिजे. गुटखा बंदीच्या विरोधात काम करणाऱ्यांवर हल्ले होत असतील तर त्याला गृह खातेच जबाबदार आहे. त्यात हल्ला झाल्यानंतर तक्रार घेण्यास देखील पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यामुळे त्या पोलीस ठाण्याची चौकशी झाली पाहिजे असे त्या म्हणाल्या
चव्हाण यांच्या विचारांचे अनुकरण होणार का?
शरद पवार यांचा फोटो न लावण्याचा निर्णय घेऊन अजित पवार गटाने आता यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावण्याच्या निर्णयाचे खा. सुळे यांनी स्वागत केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे आहेत. त्यांचा फोटो कोणीही लावू शकतो. पण त्यांचे विचार महत्वाचे आहे. त्यांना भाजपची दोस्ती चालत नव्हती. त्यामुळे त्यांच्या विचाराचे अनुकरण होणार का हा खरा प्रश्न असल्याचे त्या म्हणाल्या.