ब्रिस्बेन –बीसीसीआय, ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ, क्विन्सलॅंड प्रशासन यांच्या चर्चेतून अखेर मार्ग निघाला आणि या दोन संघांतील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा चौथा सामना येथेच होणार हे स्पष्ट झाले. मात्र, असे असले तरीही भारतीय संघाला दिलासा मिळणार नाही अशी स्थिती या मैदानावरील इतिहास पाहिला तर समोर येते.
ब्रिस्बेन मैदान यजमान संघासाठी सर्वात लकी ठरलेले आहे. गेल्या जवळपास 34 वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाला या मैदानावर एकही पराभव स्वीकारावा लागलेला नाही. यापूर्वी 1988 साली ऑस्ट्रेलियाला वेस्ट इंडिजने याच मैदानात पराभूत केले होते. मात्र, त्यानंतर गेल्या 31 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने या मैदानावर एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघाने या सामन्यात विजय मिळवला तर तो ऐतिहासिक ठरेल. तसेच दोन वर्षांपूर्वी भारतीय संघाने यजमान संघाला त्यांच्याच देशात पराभूत करत मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्याच कामगिरीची यंदाही पुनरावृत्ती होईल.
चौथ्या कसोटी सामन्यात उतरत असताना भारतीय संघाला अनेक अडचणींतून मार्ग काढायचा आहे. भारताचे पाच खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात कोणाला स्थान मिळते, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्रस्त बनलेल्या भारतीय संघात यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यासाठी मोठे फेरबदल होणार आहेत. बेंचवर असलेल्या खेळाडूंना हा सामना खेळण्याची लॉटरी लागणार आहे. शुभमन गिल व हिटमॅन रोहित शर्मा हे दोन्ही सलामीवीर भरात असून त्यानंतर चेतेश्वर पुजारा, बदली कर्णधार अजिंक्य रहाणे देखील सरस कामगिरी करत आहेत. तरीही पृथ्वी शॉ व यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा यांना संघात स्थान मिळेल.
ऋषभ पंतच्या दुखापतीबाबत अद्याप काहीही सांगण्यात येत नसले तरीही त्याच्याजागी साहा याचा पर्याय आहे. मयंक आग्रवाल देखील जायबंदी झाल्याने शॉ याला स्थान मिळेल. भारतीय संघ या सामन्यात चार गोलंदाजांसह उतरण्याची तयारी करत असल्याने रवींद्र जडेजाच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच महंमद सिराज व नवदीप सैनी यांच्यासह टी. नटराजनच्या नावाचाही विचार होऊ शकतो.
नवोदित गोलंदाजांना बुमराहचा सल्ला
दुखापतीने त्रस्त असलेल्या भारतीय संघाने बुधवारी ( दि. 13) कसून सराव केला. नेटमध्ये सराव करतानाच दुखापतीने जायबंदी झालेल्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्यासह संघातील नवोदित खेळाडूंशी संवाद साधताना सल्लेही दिले. भारतीय संघाने सकाळ व दुपार अशा दोन्ही सत्रात फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षणाचा सराव करण्याबरोबरच तसेच तंदुरुस्ती टिकवणासाठी व्यायामही केला.