सिडनी – करोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे ब्रिस्बेन शहरात तीन दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या कसोटी सामन्याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ जरी हा सामना ब्रिस्बेनलाच होणार असे ठामपणे सांगत असले तरीही याबाबतचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना येत्या 15 तारखेपासून सुरु होत असून जर ब्रिस्बेनमधील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला तर हा सामना सिडनीतच घेतला जाण्याची शक्यता वाढली आहे.
ब्रिस्बेनमधील विलगीकरणात सवलत देण्याची मागणी बीसीसीआयने केली होती. मात्र, त्याचवेळी येथे करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने आता या मागणीला केराची टोपली दाखवली जाण्याची शक्यता जास्त आहे. तसेच अशी सवलत जर देण्यात आली नाही तर भारतीय संघ ब्रिस्बेनला जाण्यास नकार देण्याचेही संकेत मिळत आहेत.
विलगीकरणाबाबत बीसीसीआयची अट
विलगीकरणातील नियमांबाबत भारतीय क्रिकेट संघाला सवलत मिळाली तरच ब्रिस्बेन कसोटीत सहभागी होऊ, असा स्पष्ट संकेत बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाला दिले आहेत. ब्रिस्बेनमध्ये करोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे भारतीय संघाला ब्रिस्बेनमध्ये दाखल झाल्यावर विलगीकरणात राहावे लागेल, अशी भूमिका क्विन्सलॅंड प्रशासनाने घेतली आहे. मात्र, बीसीसीआयने त्याला विरोध केला आहे. जर विलगीकरणाचे नियम शिथिल केले तरच भारतीय संघ चौथा कसोटी सामना ब्रिस्बेनला खेळेल, असेही बीसीसीआयने सांगितले आहे.