मुंबई – येथील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघात कसोटी सामना चालू आहे. या कसोटीचा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने त्यांच्यावरील फॉलोऑनचा धोका टाळताना ५ विकेट्सच्या मोबदल्यात २३३ धावा फलकावर चढविल्या आहेत. या धावसंख्येच्या आधारे ऑस्ट्रेलिया तिसऱ्या दिवस अखेर ४६ धावांनी आघाडीवर आहे.
याआधी टीम इंडियाचा पहिला डाव ४०६ धावांवर आटोपला होता. तर, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २१९ धावा केल्या होत्या. पहिल्या डावाच्या जोरावर भारतीय संघाला १८७ धावांची आघाडी मिळाली होती. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाकडून अॅनाबेल सदरलँड(१२) आणि अँश्ले गार्डनर(७) नाबाद खेळत होते. या दोघींमध्ये सहाव्या विकेटसाठी १२ धावांची भागीदारी झाली आहे.
ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर बेथ मुनी आणि फोबी लिचफिल्ड यांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. बेथ ३३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. लिचफिल्डने १८ धावा केल्या. यानंतर एलिस पेरीने ४५ धावांची चांगली खेळी केली. ताहिला मॅकग्राने ७३ धावांचे योगदान दिले. त्याचवेळी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या चेंडूवर अॅलिसा हीली ३२ धावा करून बाद झाली. भारताकडून स्नेह राणा आणि हरमनप्रीत कौर यांनी आतापर्यंत प्रत्येकी दोन विकेट घेतल्या आहेत.
तिसऱ्या दिवशी भारताच्या अवघ्या ३० धावा
तिसऱ्या दिवसाचा खेळ चालू झाला तेव्हा भारत ११९ षटकांत ७ बाद ३७६ धावांवर होता. मात्र पुढील अवघ्या सहा षटकांत भारताने आपल्या उर्वरित तीन विकेट्स झटपट गमाविल्या. ७० धावांवर खेळणारी दिप्ती शर्मा ७८ धावा करून बाद झाली. त्यानंतर पुजा वस्त्रकारनेही ४७ धावांवर आपली विकेट सोडली. त्यानंतर फलंदाजीस उतरलेली रेणुका सिंगही जास्त वेळ खेळपट्टीवर तग धरू शकली नाही व भारताचा डाव १२६.३ षटकांत ४०६ धावांवर आटोपला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलियाः पहिला डावः ७७.४ षटकांत सर्वबाद २१९; भारतः पहिला डावः १२६.३ षटकांत सर्वबाद ४०६(पुजा वस्त्राकार ४७, दिप्ती शर्मा ७८; अँश्ले गार्डनर ४-१००, किम गर्थ २-५८, जेस जोनासन १-४२); ऑस्ट्रेलियाः दुसरा डावः ९० षटकांत ५ बाद २३३(बेथ मुनी ३३, एलिसा पेरी ४५, तहलिया मॅकग्रॉथ ७३-१७७ चेंडू, अलिसा हेली ३२, अँनाबेल साऊथरलँड खेळत आहे १२, अँश्ले गार्डनर खेळत आहे ७; स्नेह राणा २-५४, हरमनप्रित कौर २-२३).