औरंगाबाद – लखीमपूर खेरी येथे आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चार शेतकऱ्यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतील पक्षांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले. या बंदला काही ठिकाणी कडकडीत तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. मात्र औरंगाबाद शहरात मुख्य बाजारपेठ सोडता इतर ठिकाणी दुपारनंतर बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत शहरातील मुख्य बाजारपेठेत मोर्चा काढून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. नेते-कार्यकर्ते आल्यावर तात्पुरती दुकाने बंद करण्यात आली, मात्र नंतर शहरातील विविध ठिकाणची दुकाने सुरूच असल्याचे दिसून आले.
शहरातील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या वतीने प्रमुख बाजारपेठेतून मोर्चा काढण्यात आला. पैठण गेट ते शहागंज या मुख्य बाजार पेठेतून मोर्चा काढून व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. सिडको, हडको आणि इतर भागातील व्यापाऱ्यांनी मात्र दुकाने सुरु ठेवल्याचे चित्र दिसून आले. तसेच ग्रामीण भागातही महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून आला.
शहरातील ज्या भागात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करत आहेत, तेवढ्याच भागात काही वेळ दुकाने बंद ठेवली. नेते-कार्यकर्ते गेल्यानंतर मात्र दुकाने पुन्हा सुरु केली जात आहेत. शहरातील प्रमुख बाजारपेठ वगळता इतर भागातील कपडा, किराणा, सराफा अशी सर्व दुकाने सुरु आहेत. ऐन नवरात्रीच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीने बंदचे आवाहन केल्याने व्यापाऱ्यांनी त्याला प्रतिसाद न देण्याचा निर्णय घेतला होता.