राहुल गोखले
निवडणुकीत कोणी तरी जिंकते आणि कोणी तरी पराभूत होते. त्यात नवीन काही नाही. मात्र, विजयी होऊनही निखळ समाधान न मिळणे आणि पराभूत होऊनही निराश न होणे हे घडणे तसे दुर्मीळच.
राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे जे निकाल लागले आहेत त्यांनी विविध राजकीय पक्षांना एकीकडे हा अनुभव दिला आहे आणि दुसरीकडे काहींना धडा आणि काहींना बोध दिला आहे. “अबकी बार दो सौ पार’ अशी भाजपची घोषणा आणि वल्गना होती. पाचच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहता ती घोषणा अवाजवी वाटावी अशी नव्हती. त्यातच अन्य पक्षांतून घाऊक प्रमाणावर भाजपमध्ये जो आयारामांचा प्रवेश होत होता तो पाहता भाजप विजयी पक्ष होणार हे गृहीतच धरले जात होते. मात्र, हे गृहीतक मतदारांनी ग्राह्य धरले नाही. भाजप-शिवसेना युतीला सत्ता अवश्य मिळाली आहे; मात्र भाजपची स्वबळावर सत्ता मिळून शिवसेनेला शह देण्याची जी इच्छा होती ती फलद्रुप झाली नाही आणि त्यामुळे सत्ता मिळूनही निखळ समाधान नाही अशी भाजपची स्थिती आहे. अर्थात विजयात विनम्रता हवी आणि पराभवात आत्मचिंतन असे म्हटले जात असले तरी अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्याने विजयी होऊनही आत्मचिंतनाची वेळ भाजपवर आली आहे.
भाजपची रणनीती ही अन्य पक्षांच्या तुलनेत खूपच आखीव असते हे नाकारता येणार नाही. मात्र, पक्षाविषयी मत बनविताना मतदार तेवढेच पाहत नाहीत हेही खरे. भाजपने आता आपल्याला मिळालेली सत्ता कायमस्वरूपी आहे असा समज करून घेतला होता. मात्र गेल्याच डिसेंबरमध्ये तीन राज्ये गमावण्याची वेळ भाजपवर आली होती हे भाजपचे मुखंड विसरले. केंद्रात सत्ता मिळाली म्हणजे सर्वत्र सत्ता मिळेलच आणि मोदी जादू चालेलच असे मानण्याची गफलत भाजपने केली. कर्नाटकात कॉंग्रेस-जनता दल सरकार पाडले तेही राजकीय क्लृप्त्या करूनच. त्यातच मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार हेही लवकरच गडगडेल म्हणून वातावरण निर्मिती केली. अशा वातावरणाचा परिणाम आता आपल्याला कोणी रोखणार नाही या भावनेत रूपांतरित होत असतो आणि तोच घातक असतो. भाजप त्याच फाजील आत्मविश्वासाचा बळी ठरला आहे आणि आता शिवसेनेकडे सत्तेच्या चाव्या आल्यानंतर शिवसेना भाजपकडे आग्रही मागण्या करेल यात शंका नाही. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपला केंद्रात स्वबळावर सत्ता मिळाल्यावर मोदींनी शिवसेनेची बोळवण नगण्य खात्यावर केली होती हेही विसरून चालणार नाही.
आरेतील वृक्षतोड असो किंवा अन्य पक्षांची फोडाफोड असो; भाजपचा वारू चौखूर उधळला होता आणि त्याला कारणीभूत होती ती स्वप्रतिमेत धन्यता मानण्याची वृत्ती. मोदींची अमेरिका भेट असो किंवा 370 वे कलम रद्द करण्याचा निर्णय असो; वास्तविक हे राष्ट्रीय मुद्दे आहेत. पण राज्यातील मतदानाशी त्यांचा थेट संबंध नाही. पण असल्या मुद्द्यांभोवती निवडणूक फिरवत ठेवण्याचा मानस भाजपचा होता. तो अंगलट आला आणि मोदी आणि शहा जेथे सभा घेतील तेथे भाजपला विजयच मिळेल हा भ्रमही संपुष्टात आला. परळीत पंकजा मुंडे यांचा पराभव हे त्याचे ज्वलंत उदाहरण. दुसरीकडे अन्य पक्षांतून घाऊक प्रमाणात आगंतुकांना प्रवेश दिला जात असताना अनेकांनी त्याविषयी नाराजी प्रकट केली होती. पक्षासाठी निरपेक्षपणे काम करणारे कार्यकर्ते सोडून केवळ आयात नेत्यांना उमेदवारी देण्याचा जो घाट भाजपने घातला तोही मारक ठरला.
त्याचे मुख्य कारण म्हणजे ज्यांच्यावर भाजप सडकून टीका करीत असे तेच भाजपवासी झाल्यावर त्यांना उमेदवारी दिली गेली. मतदारांना हे रुचले नाही. कारण त्या पक्षांतरामागे नैतिक भूमिका नव्हती तर केवळ स्वार्थ आणि सोयीस्करपणाची भूमिका होती. उदयनराजे भोसले यांच्यापासून हर्षवर्धन पाटील यांच्यापर्यंत अनेक आयाराम पराभूत झाले हा जसा त्या आयातांना धडा आहे तद्वतच तो भाजपला देखील आहे. काहीही करून आणि अगदी तत्त्वांशी तडजोड करूनही सत्ता हे भाजपचे धोरण मतदारांनी नाकारले आहे.
भाजपने केंद्रात स्वबळावर सत्ता मिळाल्यावर कॉंग्रेसला केवळ तांत्रिक मुद्द्यावर लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळू दिले नव्हते. राज्यात शिवसेनेने सतत सत्तेत राहूनही विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली असली तरीही भाजपने देखील शिवसेनेला सन्मानाची वागणूक दिली नाही. ऐन निवडणुकांच्या तोंडावर अनेक नेत्यांना ईडीची नोटीस गेली. यात सरकारचा काहीही हात नाही असे स्पष्टीकरण भाजपने दिले तरीही एकूण “टायमिंग’बद्दल अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पक्षातील काहींना उमेदवारीपासून वंचित ठेवण्यात आले होते आणि त्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाकडे सबळ कारणेही असतील.
तथापि अन्य पक्षांतून आलेल्यांना सरसकट उमेदवारी देण्यात आली हा एकीकडे विरोधाभास तर दुसरीकडे दुटप्पीपणा होता. या सगळ्याचा एकत्रित असा एक परिणाम असतो नि तो परिणाम भाजपविषयी काहीशी नाराजी निर्माण करणारा होता. हा परिणाम दृश्य स्वरूपात दिसतोच असे नाही. किंबहुना लोकसभा निवडणुकीत मोदींच्या बाजूने असलेली सुप्त लाट कोणाच्याच लक्षात आलेली नव्हती. राज्यात भाजपविषयी अशीच नाराजीची लाट होती; तीही कोणाच्या लक्षात आली नाही असेच म्हटले पाहिजे. मोदी आणि शहा यांनी सभा घेऊनही राज्यात भाजपला स्वबळावर सत्ता मिळाली नाही आणि गेल्या वेळेपेक्षा जागा घटल्या. यात वस्तुतः फारसे आश्चर्यकारक असे काही नाही. निवडणुकीत चढ उतार होतच असतात. तथापि, भाजपने जे दावे केले होते आणि एकूणच “जितं मया’चा आवेश भाजपने दाखविला होता त्यामुळे हे यश फिके पडले आहे. 2004 मध्ये “इंडिया शायनिंग’च्या प्रभावाखाली भाजपने असाच फाजील आत्मविश्वास दाखविला होता आणि केंद्रातील सत्ता भाजपला गमवावी लागली होती. आता राज्यात देखील त्याच फाजील आत्मविश्वासाने भाजपला दणका दिला आहे.
असे प्रसंग प्रत्येक संघटनेच्या आणि पक्षाच्या आयुष्यात येत असतात जेव्हा हादरा बसतो आणि काही गमवावे लागते. यातील जागा गमवाव्या लागणे हे त्या तुलनेत कमी महत्त्वाचे कारण त्या पुन्हा मिळविता येतात. पण आपली प्रतिमा आणि आपली पत गमवावी लागली तर ती पुन्हा निर्माण करणे सोपे नसते. भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे. तूर्तास ती फारशी कानठळ्या बसविणारी नाही; पण या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले तर भाजपला सावरणे अवघड बनेल. हा क्षण सत्ता मिळूनही आत्मपरीक्षणाचा आहे तो त्यामुळेच. बुरुज ढासळण्यापूर्वी तटबंदी पक्की केली तरच गड राखता येतो याचे स्मरण भाजपने ठेवले पाहिजे.