ब्रिगे. हेमंत महाजन
24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचं संकट उद्भवल्यानंतर देशाला संबोधित करताना म्हणाले, करोनासारख्या महारोगानं जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवलं आहे. त्या राष्ट्रांकडं साधनं नाहीत, असं नाही. पण, हा आजार इतक्या वेगानं पसरत आहे की, तयारीच करता येत नाही. या वैश्विक महामारीत एकच पर्याय आहे तो म्हणजे सोशल डिस्टंसिंग. सोशल डिस्टंसिंग हे छोट्याशा गावापासून सर्वांनीच अंगीकारायचं आहे.
करोना व्हायरसकडे संकट म्हणून न बघता एक संधी म्हणून बघितले पाहिजे आणि भारताची आर्थिक व्यवस्था मजबूत करून भारत-चीन व्यापारी तूट कमी करण्याची संधी आहे. भारत सरकारच्या अभ्यासक गटाने व्हायरसमुळे भारतासमोर येणारे धोके आणि त्यापासून भारतात मिळणाऱ्या संधी यावरती एक पूर्ण अहवाल प्रकाशित केला आहे.
कच्च्या तेलाच्या किमती कोसळल्या
बेंट क्रूडचे अर्थात कच्च्या तेलाचे दर आता 30-35 डॉलरवर येऊ शकतात. याचा फायदा भारतीय इंधन बाजाराला मिळणार आहे. करोनामुळे आलेल्या मंदीमुळे आणि कच्च्या तेलाच्या जागतिक बाजारात ओपेक आणि रशियात चाललेल्या संघर्षामुळे तेलाच्या किमती खूप कमी झाल्या आहेत. तेलांच्या किमती कोसळल्यामुळे भारताचे तेलाचे बिल आता 50 टक्के कमी झाले आहे. हा आपल्या देशाला फार मोठा फायदा आहे. सर्वसामान्यांसाठी तेलाच्या किमतीतील घट ही दिलासादायकच आहे.
चीनचा विकासदर घटणार
अमेरिकेबरोबर चाललेल्या व्यापार स्पर्धेमुळे चिनी आर्थिक व्यवस्था आधीपासूनच दबावात आहे. करोना व्हायरसचा चिनी शेअरबाजारावर मोठा नकारात्मक परिणाम झाला आहे आणि अजून होण्याची शक्यता आहे. करोना व्हायरसमुळे चीनचा विकासदर एका टक्क्याने घटू शकतो. अर्थव्यवस्थेचे 9.66 लाख कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.
चीनच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर गंभीर परिणाम होत आहे. गेल्या 30 वर्षांत प्रथमच चीनची अर्थव्यवस्था इतकी ढासळली आहे. यामुळे चीन आता लष्करी आधुनिकीकरणावर कमी खर्च करेल व आपल्याला आपली लष्करी ताकद वाढवण्यास जास्त वेळ मिळेल.ऑस्ट्रेलियापासून आफ्रिकेपर्यंत, जपानपासून अमेरिकेपर्यंत अनेक देशांत चीनने अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. यामध्ये 40 अब्ज डॉलर्सचा चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरसारखे अनेक प्रकल्प आहेत. असाच कॉरिडॉर चीन, म्यानमार, नेपाळसोबत विकसित करत आहे. बॉर्डर रोड इनिशिएटिव्ह अंतर्गत अब्जावधी डॉलर्सचे प्रकल्प चीनने हाती घेतले आहेत. या सर्व प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ही भारताकरिता चांगली बातमी आहे.
पर्यायी कच्च्या माल दुसऱ्या देशांपासून
भारत आणि चीनमध्ये आपण 90 अब्ज डॉलर किमतीच्या मालाची आयात करतो तर 15 अब्ज डॉलरच्या वस्तूंची निर्यात करतो. म्हणजेच व्यापारी तूट प्रचंड आहे. भारत जगाला सुमारे 20 अब्ज डॉलरची स्वस्त औषधे निर्यात करतो; परंतु आपण बनवत असलेल्या औषधांसाठी लागणारा 85 टक्के कच्चा माल आपण चीनकडून आयात करतो. अशा बाबतीत कोणत्याही एका देशावर अवलंबून राहणे चुकीचेच आहे. त्यासाठी पर्यायी कच्च्या मालाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. चीनकडून आपण मोबाइलचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची 85 टक्क्यांपर्यंत आयात केली जाते. करोना व्हायरसमुळे आता चीनमधून आयात होणाऱ्या वस्तू येत नाहीत. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठीही आपण दक्षिण कोरिया, जपान हे पर्याय समोर ठेवायला हवेत.
व्यापारी तूट कमी करण्याची संधी
दीर्घकाळाचा विचार करता त्यातून आपलाच फायदा होणार आहे. यानिमित्ताने भारत आणि चीन यांच्यातली मोठी व्यापारी तूट कमी करण्याची संधी आहे. कापड उद्योगाला यातून मोठी संधी आहे. भारतीय कापड उद्योग आता नवीन पर्याय शोधू शकतील.
करोना व्हायरसचा भारताच्या आर्थिक व्यवस्थेवरती नेमका काय परिणाम होऊ शकतो, याचा चेंबर ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने अभ्यास केला, या अभ्यासामध्ये अनेक उपाय योजना सुचवण्यात आल्या आहेत. सरकार त्यावरती विचार करून आवश्यक पावले पण उचलत आहे. आर्थिक व्यापाराचे दोन भाग आहेत, आयात आणि निर्यात. सध्या आपण चीनपासून प्रचंड आयात करतो. निर्यात फार कमी आहे आणि व्यापाराची तूट प्रंचड आहे जी भारताकरिता धोकेदायक आहे, ती आता कमी होण्याची शक्यता आहे.
आपली क्षमता वाढविणे गरजेचे
देशात औषधी निर्माणाचा 80 टक्के कच्चा माल चीनमधून येतो. मात्र, कच्च्या मालाचे निर्माण हे आपल्या देशातील सरकारी कारखाने म्हणजे हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड किंवा इतर कारखान्यांमध्ये करता येईल, जे करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. भारतीय कारखाने हे नेहमीच अत्यंत कमी क्षमतेने काम करतात. ही संधी आहे की त्यांनी आपली क्षमता वाढवून जास्त वस्तू निर्माण कराव्या, ज्यामुळे किमती पण खाली येतील.
आपण चीनऐवजी दुसऱ्या देशांपासून आयात करून व्यापारी तूट कमी करू शकतो. चीनऐवजी दुसऱ्या राष्ट्रातून आयात करण्याकरिता आपल्याला इम्पोर्ट ड्युटी म्हणजे आयातीवर लागणारा कर कमी करावा लागेल.
अनावश्यक वस्तूंची विनाकारण आयात पण आता आपोआप थांबत आहे, जसे की सणांना लागणारे सामान, खेळणी, शोभेच्या वस्तू. सामान्य नागरिकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून चीनला दणका द्यावा.
निर्यात क्षेत्रामध्ये वाढ करण्याकरता
मात्र सध्या सर्वात जास्त संधी निर्यात क्षेत्रामध्ये वाढ करण्याची भारतासमोर आहे. त्याचा पुरेपूर वापर केला जावा. करोना व्हायरसमुळे चीन अनेक महिने जगाची फॅक्टरी म्हणजे कारखाना राहू शकणार नाही. म्हणून मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जगाचा कारखाना बनण्याची भारतास संधी आहे. त्याचा पूर्ण वापर करून आपण चीनमधून बाहेर पडणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांना भारतामध्ये कारखाने स्थापन करण्यास भाग पाडावे आणि आपली निर्यात करण्याची क्षमता वाढवावी.
चीन आणि अमेरिका व्यापारयुद्ध सुरू झाल्यानंतर अशीच संधी आपल्या समोर आली होती. आपण त्याचा पूर्ण फायदा घेऊ शकलो नाही. याउलट बांगलादेश, व्हिएतनाम आणि काही देशांनी ही संधी घेऊन आपली निर्यात क्षमता वाढवली. आशा करूया की या वेळेला सरकार आणि उद्योगजगत जास्त चपळपणा दाखवून मिळालेल्या संधीचा वापर करून भारताला जगाचा कारखाना बनवण्याकरता एक मोठे पाऊल उचलतील.