मुंबई – गोरखनाथ मंदिरावरील हल्ल्याचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पोलिसांचे पथक आज मुंबईत दाखल झाले. या प्रकरणातील आरोपी मुर्तझा नवी मुंबईमध्ये ज्या ठिकाणी रहात होता, तेथे या पथकाने भेट दिली. मुर्तझा हा गेल्या तीन वर्षांपासून त्याच्या कुटुंबीयांना भेटलेलाच नाही, अशी माहिती या पथकाला मिळाली.
मुर्तझा हा मानसिकदृष्ट्या स्थिर नाही आणि त्याची गुन्हा करण्याची कोणतीही तयारी नव्हती, असे मुर्तझाच्या वडिलांनी “एटीएस’ला सांगितले. मुर्तझा लहानपणापासूनच मानसिकदृष्ट्या नैराश्यावस्थेत आहे. त्याच्यावर वैद्यकीय उपचारही सुरू होते. मानसिक आजारात काही सुधारणा झाल्यावर “पोलीस आपल्या मागे आहेत.’ असे मुर्तझाला वाटू लागले आहे, असेही मुर्तझाचे वडील मुनीर अहमद अब्बासी यांनी “एटीएस’च्या अधिकाऱ्यांना सांगितले.
उत्तर प्रदेशातील गोरखनाथ मंदिरात मुर्तझाने बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याने सुरक्षेसाठी तैनात असललेल्या दोन पोलीस हवालदारांवर कोयत्याने वारही केले होते. मुर्तझाला पोलिसांनी अटक केली आहे.