लखनौ – समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी महागाईच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्ला चढवला. भारतीय जनता पक्ष एखाद्या नफेखोर कंपनीसारखे वागत असून या पक्षाचे सरकार स्वत: कोणताही तोटा सहन न करता लोकांवर दरवाढीचा बोजा वाढवत चालला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
अखिलेश यांनी ट्विटरवर ही प्रतिक्रीया दिली आहे. कंपन्यांनी आपल्या मालाच्या किमती वाढल्याने भारतात राहणीमानाचा खर्च वाढला या बातमीचे कात्रणही अखिलेश यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर सादर केले आहे. आजच्या महागाईच्या काळात कंपन्या जनतेकडून वाढत्या खर्चाची वसुली करत आहेत पण त्यांचा नफा कमी करत नाहीत.
लोकशाहीत सरकारची भूमिका केवळ राज्य करणे ही नाही तर सार्वजनिक हिताची धोरणे बनवणे आणि त्याची अंमलबजावणी करणे आहे. सामान्य जनतेचे शोषण आणि त्यांच्यावर होणारा अत्याचार या बाबी सरकारनेच थांबवायच्या असतात पण भाजप सरकारची भूमिका मात्र एखाद्या कंपनी मालकाला शोभेल अशी आहे असे त्यांनी म्हटले आहे. इंधनाच्या दरात गेल्या तेरा दिवसात पेट्रोल – डिझेलचे दर तब्बल 9 रूपये 20 पैशांनी वाढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही टीका केली आहे.