सेनापती बापट रस्त्यावर प्रायोगिक प्रकल्प
पुणे – शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत प्रस्तावित ऍडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमच्या (एटीएमएस) अंमलबाजवणीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. स्मार्ट सिटीकडून सेनापती बापट रस्त्यावर या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार असून चार चौकांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वीत करण्यात येणार आहे. त्यानंतर तेथील वाहतुकीचा अभ्यास करून त्याचा नेमका किती फायदा झाला हे तपासण्यात येणार आहे.
शहरातील वाहतूक कोंडीचे सर्वेक्षण स्मार्ट सिटीकडून करण्यात आले होते. त्यात, वाहनांच्या वाहतुकीचा वेग प्रतितास 18 वर आला असून पुढील दशकभरात तो आणखी कमी होणार असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे वेळीच या वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी स्मार्ट सिटीकडून “एटीएमएस’ प्रकल्प प्रस्तावित केला होता. मात्र, त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकल्प केवळ चर्चेतच होता. मात्र, नुकत्याच झालेल्या स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रकल्पासाठीच्या निविदाधारकांना या प्रकल्पाची उपयुक्तता सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, या कंपन्या सेनापती बापट रस्त्यावरील चार चौकांत ही यंत्रणा उभारणार आहेत.
त्यानुसार, सध्या अस्तित्वात असलेल्या सिग्नल यंत्रणा सात दिवस बंद केली जाणार असून आयटीएमएस यंत्रणा चालू केली जाणार आहे. हा सात दिवसांचा प्रयोग संपल्यानंतर वाहतुकीत काय बदल झाला याचा अहवाल सादर केला जाणार आहे. मात्र, सात दिवसांनंतर पुन्हा जुनी यंत्रणा सुरू केली जाणार आहे.
असा आहे एटीएमएस प्रकल्प
या प्रणालीनुसार प्रत्येक रस्त्यावरील वाहतुकीचा स्वतंत्ररित्या अभ्यास करत त्यानुसार सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. रस्त्यावरील वाहनांची गर्दी लक्षात घेऊन ही प्रणाली तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या स्तरावर सिग्नल यंत्रणेत तत्काळ बदल करणार आहे. स्मार्ट सिटी कंपनीने काढलेल्या निविदांनुसार शहरातील 262 चौकांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यातील 100 चौकांचे डिझाइन पूर्ण करण्यात आले आहे. पहिल्या फेजमध्ये 126 चौकांमध्ये तर, दुसऱ्या फेजमध्ये उर्वरित 135 चौकांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.