हिंगोली (प्रतिनिधी) – हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील गौतम कोंडाबा नरवाडे या 55 वर्षीय इसमाचा खांजिराने गळा कापून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारात घडली. त्यानंतर गावात जाऊन आखाडा बाळापूर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असले तरीही मयताच्या नातेवाईकांनी आरोपीस आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करीत बाळापुर येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको सुरू केल्याने गोंधळ उडाला आहे.
शेवाळा येथील गौतम नरवाडे हे चौकातील एका हॉटेल मध्ये सकाळी दहा वाजता चहा पीत बसले होते. शेख मुस्ताफ शेग जिलानी हा युवक तिथे आला. त्याने नरवाडे यांना काही कळायच्या आत त्याचा खांजिराने गळा कापून, छातीवर दोन ते तीन वार केले. यानंतर तो तिथेच थांबला. लोकांनी गर्दी केली हळूहळू मयताचे नातेवाईक जमले त्यानंतर काहींनी आरोपीस मारहाण केली. तोपर्यंत पोलिसही दाखल झाले होते त्यांनी आरोपीस वैद्यकीय चाचणीसाठी बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले.
अवघ्या एक किमी अंतरावर असलेल्या शेवाळा येथील नागरिक ही मागोमाग तेथे धडकले. आरोपीस वाहनातून नेत असताना ते वाहनावर चालून गेले मात्र पोलिसांनी शिताफिने आरोपीस कळमनुरीला हलवले. आरोपीस आमच्या ताब्यात द्या म्हणून ग्रामस्थांनी आखाडा बाळापूर येथे राष्ट्रीयमहामार्गावर रास्ता रोको केले बायपासही आडवला. दुपारी एक वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता. उपविभागीय अधिकारी किशोर कांबळे बाळापुरात दाखल झाले असून नातेवाईकांच्या भावना जाणून घेत आहेत.
हत्येमागील कारण अद्याप गुलदस्त्यात
मयत हे पाणीपुरवठा योजनेच्या गळती दुरुस्तीचे काम करतात तर आरोपीच्या वडिलांचे मित्र आहेत. शिवाय मयत नरवाडे यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहेत. शेखने हे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र अजून कळले नाही.