मुंबई – राज्यात सत्तांतर झाले असून महाविकास आघाडीचे सरकार कोलममधून शिंदे गट-भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. सत्तेत येताच मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आधीच्या सरकारच्या काळात घेण्यात आलेले निर्णय बदलण्याचा धडाका लावला आहे. यंदा राज्यावरील करोनाचे संकट दूर झाले असल्याने सण-उत्सव कोणत्याही निर्बंधांविना साजरे करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासोबतच आधीचे सरकार हिंदूंच्या सणांवेळी निर्बंध लादत होत असा आरोप करताना आता राज्यात हिंदूंचे सरकार आले असून सण, उत्सव आनंदात साजरा करा असा दावा देखील सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आला आहे. हाच धागा पकडत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना राज्य सरकारकडून केवळ मदतीची घोषणा केली आहे, ही मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. राज्यातील भाजपाप्रणित ईडी सरकार हे हिंदू हिताचा केवळ दिखावा करत आहे. प्रत्यक्षात हे सरकार शेतकरी विरोधी आहे. हिंदूंचे सरकार आले असून सण, उत्सव आनंदात साजरा करा असा डांगोरा पिटणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू शेतकरी मात्र मदतीपासून वंचित आहे.’ अशी टीका पटोले यांनी केली. ( Nana Patole on Shinde Fadanvis Government )
सत्तार यांचा शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही – अब्दुल सत्तारांवर निशाणा
पटोले यांनी यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तर यांचा शेतीशी काडीचा संबंध नसल्याचा आरोप केला. ते म्हणाले, ‘आजही कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती दाखवण्यासाठी एक कार्यक्रम जाहीर केला पण तो केवळ इव्हेंट आहे. अशा इव्हेंटमधून शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार नसल्याचे त्यांनी म्हटले. कृषी मंत्री हा शेती व शेतकऱ्यांची जाण असणारा असायला हवा पण सध्याच्या कृषीमंत्र्यांबाबत तसे नाही. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही, त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख काय कळणार? असा सवाल ही पटोले यांनी केला. एखादा इव्हेंट करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील असा त्यांचा दावा असेल तर तो साफ चुकीचा आहे.’
त्याच शेतकऱ्याने आत्महत्या केली
‘राज्यातील सध्याचे सरकार हे केवळ इव्हेंटबाज आहे. या सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणेघेणे नाही. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. आजही पंचनामेच सुरू आहेत. शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखवण्यासाठी भाजपच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी यवतमाळच्या एका गावातील शेतकऱ्याच्या घरी मुक्काम केला. पण नंतर त्याच शेतकऱ्याने आत्महत्या केली’ असा दावा पटोले यांनी केला. ( Nana Patole on Shinde Fadanvis Government )