नवी दिल्ली (वंदना बर्वे) – भारतीय जनता पक्षासाठी यंदाचे वर्ष खूप महत्वाचे आहे. मध्यप्रदेश आणि कर्नाटकसह नउ राज्यांत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भगवा फडकविण्यासाठी छातीला माती लावून मैदानात उतरण्याचे आवाहन भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी अध्यक्षीय भाषण करताना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांना केले.
देशाची राजधानी दिल्लीतील “एनडीएमसी’च्या कन्वेंशन सेंटरमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या द्विदिवसीय बैठकीला आजपासून सुरवात झाली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा, महासचिव (संगठन) बीएस संतोष, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीमारमण, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासह केंद्रातील 35 मंत्री, 12 राज्यांचे मुख्यमंत्री, 37 राज्यांचे प्रदेशाध्यक्ष यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे आणि राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ हेही या बैठकीला उपस्थित आहेत.
माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, नड्डा यांनी यंदा मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक आणि राजस्थानसह 9 राज्यांमध्ये होणाया विधानसभांच्या निवडणुका भाजपसाठी खूप महत्वाच्या आहेत. यामुळे कार्यकारिणीच्या प्रत्येक सदस्याने पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या कामाला लागले पाहिजे. ज्या राज्यांत भाजपचे सरकार आहे तेथे संघटना मजबूत करायची आणि जेथे सरकार नाही तेथे आणखी ताकदीने संघटना बळकट करायची. यंदा एकही राज्य भाजपच्या हातून जाता कामा नये, याची खास काळजी घेण्याची गरज असल्याचेही नड्डा आपल्या भाषणात म्हणाले.
नड्डा यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे गुजरातमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशाचाही उल्लेख केला. हिमाचल प्रदेशात दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा भाजपला बदलायची होती. परंतु, त्यात यश आले नाही. हिमाचल हातातून गेले हे खरे असले तरी कॉग्रेस आणि भाजपमधील मतांचे अंतर फक्त 37 हजार आहे, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले. दरम्यान, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो झाला. संसद मार्ग ते एनडीएमसी कन्वेंशन सेंटरपर्यंत हा रोड शो होता.
तेलंगणातील पुढील सरकार भाजपचेच..
पंतप्रधानांनी भारताची परंपरा आणि भारताची संस्कृती जोपासण्यावर नेहमीच भर दिला आहे. म्हणूनच अयोध्येत निर्माण होत असलेल्या राम मंदिरात सिमेंट आणि लोखंडाचा कमीतकमी वापर केला जात आहे. देश गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडत आहे. राजपथचे कर्तव्यपथ आणि इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा बसविणे याचे उदाहरण आहे. अनुसूचित जातीजमाती, आदिवासी, ओबीसी यांच्याशिवाय निवडणुकीची नाव पैलतिरी लागणार नाही याची जाणीवही जेपी नड्डा यांनी आपल्या भाषणात करून दिली. तेलंगणाचे सरकार भाजपच्या कार्यकर्त्यांवर कितीही अन्याय करीत असले तरी तेथील पुढचे सरकार भाजपचेच राहणार असल्याचेही ते म्हणाले.