रंगारेड्डी (तेलंगणा) :- तेलंगणातील निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने अनुसुचित जाती आणि जमातीच्या कल्याणाच्या संबंधात 12 कलमी जाहीरनामा घोषित केला आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जिल्ह्यातील चेवेल्ला येथे एका जाहीर सभेत हा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
यावेळी बोलताना खर्गे म्हणाले की, राज्यात कॉंग्रेसची सत्ता येताच अनुसूचित जाती-जमाती समाजासाठी जाहीरनाम्यातील आश्वासनांची अंमलबजावणी केली जाईल. सरकारी खरेदी आणि सर्व करारांमध्ये अनुसूचित जातींसाठी 18% आणि अनुसूचित जमातींसाठी 12% आरक्षणाचा या आश्वासनात समावेश आहे.
एससी आणि एसटी समुदायांसाठी इतर काही महत्त्वाच्या आश्वासनांमध्ये खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण लागू करणे, 3 एससी महामंडळांची स्थापना; 3 एसटी महामंडळाची निर्मिती, या समाजासाठी प्रत्येक मंडळात एक निवासी शाळांची स्थापना अशी आश्वासने यात देण्यात आली आहेत. यावेळी खर्गे यांनी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि भाजप यांच्यात गुप्त समझोता झाला असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांना सत्तेवरून हटवण्याचे आवाहन त्यांनी केले.
केसीआर यांच्या सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केला आणि संपूर्ण तेलंगणा ही त्यांची वैयक्तिक मालमत्ता असल्यासारखे ते वागले. ते म्हणाले की, वेगळ्या तेलंगणा राज्याच्या निर्मितीचा दावा करणे हा एका व्यक्तीचा अधिकार नाही, कॉंग्रेस पक्षाने तेलंगणाचे “स्वप्न” साकार करण्यास मदत केल्याचा दावा खर्गे यांनी केला.