पिंपरी (प्रतिनिधी) – करोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील कलावंतांचे काम जवळपास तीन महिन्यांपासून बंद आहे. काम बंद असल्याने नाट्य, चित्रपट क्षेत्रातील कलाकार, पडद्यामागील कलाकार, आर्केस्ट्रातील कलाकार, रंगभूषाकार, नेपथ्यकार, वेशभुषाकार, लोककलावंत, शाहीर अशा सर्वांचीच अवस्था बिकट झाली आहे. त्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, सांस्कृतिक भूक भागवणारा कलावंत हा एक मुख्य घटक आहे. कलाकारांसमोर सध्या भयावह परिस्थिती उभी ठेपली आहे. लोककलावंत, चित्रपटसृष्टी आणि नाट्य क्षेत्रातील कलावंत, रंगभुषाकार, वेशभुषाकार, नेपथ्यकार, शाहीर आदी कलावंतांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये त्यांची सर्वच कला बंद पडलेली आहे. त्यांना कोणत्याही स्वरूपाचा आधार नाही.
कलाकारांच्या कलेवरच त्यांच्या कुटुंबांची उपजीविका चालत असते. जिल्हाधिकारी, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद यांच्या माध्यमातून कलावंतांना धान्य कसे मिळेल, यासाठी पावले उचलण्यात यावी. चित्रपट महामंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र शाहीर परिषद, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आदी शाखांच्या माध्यमातून जे कलाकार आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल आहेत, त्यांची यादी निश्चितपणे मिळेल. त्यामध्ये कोणताही पक्षीय भेदभाव न करता कलावंतांना मदत पोहोचणे अत्यंत महत्वाचे आहे. सध्या नाट्यसंमेलन हे जवळपास रद्द झालेले आहे. त्यासाठी लागणारा 5 ते 10 कोटींचा खर्च तसेच महाराष्ट्र भुषणसारख्या पुरस्काराचे सोहळे आणि त्यांच्यावर लागणारा सर्व खर्चाचा निधी वर्ग करून कलावंतासाठी वापरावा.