नवी दिल्ली – मस्कत येथे होणाऱ्या महिलांच्या आशिया करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या 18 खेळाडूंच्या संघाची निवड करण्यात आली आहे. अनुभवी गोलकीपर सविता पुनियाकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून नियमित कर्णधार राणी रामपाल हिला दुखापत झाल्याने तीचा समावेश करण्यात आलेला नाही.
हॉकी इंडियाने जाहीर केलेल्या संघात यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या 16 खेळाडूंचा समावेश आहे. नियमित कर्णधार राणी रामपाल बंगळुरूमध्ये दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे 21 ते 28 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी सविताची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जपान, मलेशिया आणि सिंगापूरसह भारताला अ गटात स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मलेशियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. यानंतर भारताचे सामने जपान (23 जानेवारी) आणि सिंगापूर (24 जानेवारी) असे होणार आहेत. उपांत्य फेरीचे सामने 26 जानेवारीला, तर अंतिम सामना 28 जानेवारीला होणार आहे. स्पर्धेतील अव्वल चार संघ 2022 साली स्पेन आणि नेदरलॅंड्स येथे होणाऱ्या विश्वकरंडकासाठी पात्र ठरतील.
भारतीय महिला संघ – सविता पुनिया (गोलरक्षक, कर्णधार), रजनी एतिमार्पू, दीप ग्रेस एक्का (उपकर्णधार), गुरजित कौर, निक्की प्रधान, उदिता, निशा, सुशीला चानू, मोनिका, नेहा, सलीमा टेटे, ज्योती, नवज्योत कौर, नवनीत कौर, लालरेम्सियामी, वंदना कटारिया, मारियाना कुजूर, शर्मिला देवी.