नवी दिल्ली – भारतीय ऑलिम्पिक संघटनेने भारतीय कुस्तीगिर महासंघावर नियुक्त केलेल्या हंगामी समितीने अद्याप खेळाडूंच्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठीच्या निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन कधी होणार हे जाहीर केलेले नाही. त्यामुळे देशातील अनेक कुस्तीपटूंसह महासंघाविरोधात आंदोलन केलेल्या कुस्तीपटूंच्या या स्पर्धेतील सहभागावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा येत्या 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या दरम्यान चीनमधील हांगझाऊ येथे होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय कुस्तीपटूंची निवड चाचणी स्पर्धा घ्यावी लागणार आहे. भारतीय खेळाडूंची नावे सादर करण्याची अंतिम मुदत 15 जुलै आहे. मात्र महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात केलेल्या आंदोलनामुळे भारतातील काही कुस्तीपटूंनी निवड चाचणी पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली आहे.
आशियाई ऑलिंपिक काऊन्सिलकडे याबाबत पत्रही पाठवण्यात आले आहे, पण त्यावर अद्याप उत्तर मिळालेले नाही. त्यामुळेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेची हंगामी समितीची बैठक होऊनही निवड चाचणीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्यासह आणखी काही कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात दिवसांचे आंदोलन केले. त्यामुळे त्यांना कुस्तीच्या सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. याच कारणामुळे त्यांनी निवड चाचणी पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली आहे. यावर आशियाई ऑलिम्पिक समितीकडून येत्या दोन दिवसांमध्ये उत्तर येण्याची अपेक्षा आहे.
भुपेंदर यांच्यावर मनमानीचा आरोप
भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक होईपर्यंत हंगामी समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये भूपेंदर सिंह बाजवाल, गियान सिंह व सुमा शिरूर यांचा समावेश आहे. मात्र, भूपेंदर स्वत: निर्णय घेत आहेत. ते कुणाशीही चर्चा करीत नाहीत, असा आरोप अन्य सदस्यांनी केला आहे.