लाहोर :- पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) आशिया क्रिकेट समितीकडे (एसीसी) नुकसान भरपाईची मागणी केली आहे. आशिया करंडक स्पर्धेचे यजमान असूनही केवळ चारच सामने पाकिस्तानमध्ये खेळवले गेले. त्यामुळे मंडळाला मोठा आर्थिक फटका बसलेला असून त्याची भरपाई एसीसीने करावी अशी मागणी पाक मंडळाने केली आहे.
या स्पर्धेचे सामने श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये हायब्रीड मॉडेल अंतर्गत आयोजित केले जात आहेत. पीसीबीने या प्रकरणी कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केले नसले तरी मंडळाचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी एसीसीचे प्रमुख जय शाह यांना पत्र लिहून नुकसान भरपाईची मागणी केल्याचे सांगितले जात आहे.
5 सप्टेंबर रोजी यजमान पाकिस्तान मंडळ व एसीसीचे सदस्य यांच्यात बैठक झाली. यात कोलंबोत मुसळधार पाऊस होत असल्याने सामने हंबनटोटा येथे आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता, यानंतर श्रीलंकेचे मुख्य क्युरेटर खेळपट्टी तयार करण्यासाठी तेथून रवाना झाले होते. हंबनटोटा येथे सामन्यांचे थेट प्रक्षेपण होऊ शकेल अशी यंत्रणाही बसवण्यात आली. मात्र, अद्याप येथे सामने होणार का ते एसीसीने जाहीर केलेले नाही.