कोलंबो :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत व पाकिस्तान यांच्यातील सुपरफोर गटातील लढतीसाठी एक राखीव दिवस ठेवल्याबद्दल भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद याने आशिया क्रिकेट समितीवर (एसीसी) टीका केली आहे.
स्पर्धेतील अन्य सामन्यांसाठी एक नियम तर भारत व पाकिस्तान यांच्यातील सामन्यांसाठी वेगळा नियम असे धोरण एसीसीने ठेवले आहे. भारत व पाकिस्तान यांच्यातील सामना जास्त उत्सूकतेचा विषय असतो हे मलाही मान्य आहे, परंतू अन्य सामन्यांतही पावसाचा व्यत्यय येऊ शकतो.
स्पर्धेत जर सहा संघ आहेत, तर केवळ दोनच संघांचा विचार करायचा व बाकी चार संघांवर अन्याय करायचा हा दृष्टिकोन अयोग्य आहे. यांमुळेच अन्य संघही स्पर्धेच्या वेळापत्रकावर सतत टीका करत आहेत. याबाबत आता एसीसीने आत्मपरिक्षण केले पाहिजे, असेही प्रसाद यांनी सांगितले.
दरम्यान,आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रविवारच्या सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवल्यामुळे श्रीलंका व बांगलादेश क्रिकेट मंडळाने आशिया क्रिकेट समितीवर (एसीसी) टीका केली. या दोनच संघांसाठी स्पर्धा आहे का, असा सवालही बांगलादेश मंडळाने केला आहे.