कोलंबो :- श्रीलंकेत आणीबाणी लागली गेल्यामुळे आता तेथे होणार असलेली आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा अमिरातीत हलवण्यात येणार असल्याचे संकेत आशिया क्रिकेट समितीने दिले आहेत.
श्रीलंकेत राजकीय व सामाजीक अस्थिरता असून देशात आणीबाणीही लावली गेली आहे. महागाईने उच्चांक गाठला असून जनतेला मुलभूत सुविधाही मिळणे कठीण बनले आहे, त्यामुळे अशा स्थितीत तेथे ही स्पर्धा आयोजित करणे शक्य नसल्याचे मत समितीने व्यक्त केले असून याबाबत येत्या आठ दिवसांत अधिकृत घोषणाही केली जाणार आहे.
बीसीसीआयने ही स्पर्धा आयोजित करण्याची तयारी दर्शवली असून याबाबत समिती लवकरच निर्णय घेणार आहे. 2018 सालापासून ही स्पर्धा सातत्याने रद्द करावीलागत असून गेल्या तीन वर्षांत जगात निर्माण झालेल्या करोनाच्या धोक्यामुळेही ही स्पर्धा होऊ शकलेली नाही.
समितीने अमिराती सरकार व त्यांच्या क्रिकेट मंडळाशी चर्चा केली आहे. त्यांनीही ही स्पर्धा आयोजित करण्याची तयारी दर्शवली अशल्याचे सांगितले जात आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांचा सहभाग असलेली ही स्पर्धा येत्या 26 ऑगस्टपासून श्रीलंकेत होणार होती.