मुंबई – मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. ते 77 वर्षांचे होते. मिळलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यात आंबी एका फ्लॅटमध्ये मृतावस्थेत ते आढळले. फ्लॅट मधून दुर्गंधी येत असल्याने लोकांनी पोलिसांना कळवले. फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता ते मृतावस्थेत आढळले. दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. भाड्याने फ्लॅट घेऊन ते एकटेच तेथे राहात होते.
दरम्यान, जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी वृत्त वाहिनी बोलतांना मराठी चित्रपटसृष्टीने एक देखणा नट गमावला, असं म्हणत दुःख व्यक्त केल आहे. ते पुढे म्हणाले,’खूप वाईट घडलंय. आमच्या पिढीतला एकमेव देखणा नट गेला, असं मला वाटतं. तो हिरो आणि मी साईडला असे बरेच चित्रपट आम्ही एकत्र केले. आम्ही यशस्वी चित्रपट केले आहेत. एक चांगला माणूस, एक चांगला मित्र गेल्याने खूप दुःख होतंय. एक चांगला नट, मित्र गमावल्याचं दुःख मनात कायम राहील. नेहमी हसत खेळत वावरणारा, हसमुख चेहऱ्याचा नट होता. प्रामाणिकपणा हा त्याच्यातला सर्वात मोठा गुण होता, तो प्रत्येक भूमिका उत्तम करायचा. जे करायचा ते मन लावून करायचा, त्यामुळे तो त्या काळातला एक यशस्वी नट होता,” अशी प्रतिक्रिया अशोक सराफ यांनी वृत्त वाहिनीशी बोलतांना व्यक्त केली आहे.