पुणे -“लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात’ हे वाक्य लग्न जुळवताना अनेक जुन्या जाणत्या लोकांच्या तोंडी येतेच. अशीच एक अनन्या आणि विघ्नेश या विशेष मुलांची (डाऊनसिंड्रोम असलेले) लग्नगाठही बांधली गेली आहे. अनन्या सावंत आणि दुबईस्थित विघ्नेश कृष्णस्वामी या दोघांचे शुभमंगल नुकतेच पार पडले. देशातील अशाप्रकारचा विशेष मुलांचा हा पहिलाच विवाह असल्याचा दावा केला जात आहे.
विशेष मूल जन्माला आल्यानंतर आई-वडिलांची त्याच्या आयुष्याची चिंता भेडसावत असते. यांचे आयुर्मानही सामान्य व्यक्तीसारखेच असल्याने, आपल्यानंतर यांचे काय होईल, ही चिंताही त्यांना भेडसावत असते. मात्र, यातूनही अनन्या आणि विघ्नेशच्या पालकांनी त्यांच्यासाठी चांगले क्षण वेचण्याचा प्रयत्न केला आणि दोघांची लग्नगाठ बांधली. बावधन येथे नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत या दोघांचे थाटामाटात लग्न झाले.
अनन्या लहान असतानाच ती विशेष असल्याचे कुटुंबीयांना समजले होते. त्यावेळी अनन्याच्या वडिलांना तिची काळजी वाटली. मात्र, तिच्या आईने धीर देत वडिलांची समजूत काढली. त्यानंतर दोघांनी मिळून सामान्य मुलीप्रमाणे अनन्याला वाढवले. तिला स्वप्न पाहायला शिकवले आणि आई-वडिलांच्या कष्टाचे चिज करून अनन्या “सनशाइन चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर’मध्ये सहाय्यक शिक्षिका बनली. तेच तिचे वेगळेपण विघ्नेशच्या पालकांनी हेरले आणि तिला सून करून घेण्याचा निश्चय केला. ती आता त्याच्याबरोबर दुबईला जाणार आहे.
अशी आहे या लग्नाची गोष्ट…!
वाकड येथील “सनशाइन चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर’मध्ये अनन्या ही सहाय्यक शिक्षिका आहे. तर, विघ्नेश दुबईतील एका हॉटेलमध्ये फ्रंट ऑफिसर आहे. विशेष लोकांसाठी असलेल्या विवाह संकेतस्थळावर नोंदणी करून विघ्नेश याने तेजस्विता यांच्याशी संपर्क साधला होता. 2022 मध्ये व्हिडीओ कॉलद्वारे दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा झाली. अनन्या आणि विघ्नेश यांनी एकमेकांशी ओळख करून घेतली. दोघांनीही एकमेकांना पसंती दिली. त्यानंतर विघ्नेशचे कुटुंब भारतात आले आणि गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या दोघांचा साखरपुडा झाला आणि नुकतेच लग्नही पार पडले.