पुणे (मिलन म्हेत्रे) – पर्यावरणाचा संमतोल सांभाळण्यासाठी आणि वारी मार्गावर वृक्षाच्छादनासाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रस्थानादिवशी 16 जून 2017 या दिवशी “जय गणेश हरित वारी अभियान’ संकल्पना सुरू करण्यात आली. या अभियानांतर्गत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान देहू, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, वनराई पुणे, देवराई तळेगाव, देवराई नर्सरी, नागवि, शहा नर्सरी इंदापूर, आपलं पर्यावरण – नाशिक, वृक्षवल्ली – चिंचवड, बायोस्पेअर्स – पुणे अशा 22 संस्था सहभागी झाल्या आणि “हरित वारी” संकल्पास सुरुवात झाली.
“झाडे लावा, झाडे जगवा आणि दुष्काळ हटवा’ हे ब्रीदवाक्य घेऊन पालखी मार्गावर वृक्ष लागवड करून “हरित वारी’ करण्याचा संकल्प 16 जून 2017 मध्ये करण्यात आला. सर्व पालखी महामर्गांच्या दुतर्फा लोक सहभागातून स्वदेशी वक्षांची लागवड करून त्याचे तीन वर्षांत संगोपन करून, तसेच सर्व पालखी महामार्गावर वारकरी, लोकसहभाग आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या वृक्षांचे संवर्धन करणे हा यामगे उद्देश आहे.
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर, तसेच श्री माउली पालखी सोहळा आळंदी ते पंढपूर हे दोन्ही मार्ग हरित करण्याचा हा मानस आहे. पंढरपूर शहरात सुमारे 140 पालख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून विविध मार्गांवरून दाखल होतात.संपूर्ण महाराष्ट्रातील एकही छोटा-मोठा रस्ता नाही, तिथून वारी जात नाही, त्यामुळे वृक्षारोपण हा विषय पुढे आला. वारीचे दिवस हे पावसाळ्यातील असले तरी अनेक वेळा प्रखर उन्हाचा त्रास सहन करावा लागतो. त्यातही “अनवाणी वारी’ंचा संकलप करणाऱ्यांना सावली नसेल तर अधिक त्रास सहन करावा लागतो.
हरित वारी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 22 सप्टेंबर 2018 च्या दरम्यान पंढरपूर वाळवंटात एसटी स्टॅण्डजवळ 800 झाडे लावण्यात आली. याच्या संवर्धनाचे काम दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या माध्यमातून झाले. नंतरच्या काळात पंढरपूर देवस्थानने पाणीपुरवठा सुरू केला. पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील ओसाड भागात 5 हजार वृक्षारोपण झाले. आज हा भाग हिरवा झाला आहे. जवळजवळ 14 संतांचा पालखी मार्ग हा मंगळवेढा ते पंढरपूर असा आहे. येथे 23 किलोमीटरचा रस्ता रुंदीकरणावेळी वृक्षतोड झाली या ओसाड भागावर सुमारे 9 हजार 200 देशी झाडे लावण्यात आली.
हरित वारीची प्रेरणा
कर्नाटकातील 112 वर्षे वयाच्या पद्मश्री सालूमर्दा थिमक्का या “हरित वारी’चे प्रेरणास्थान आहे. स्वतःला मुल नसल्याने हिलीकुलसारख्या छोट्या गावात लोकापवादास सामोरे जाताना थिमक्कांना मानसिक त्रास सहन करावा लागला; पण त्यातून मार्ग काढत त्यांनी त्यांच्या गावापासून शहराकडे जाणारा रस्ता तयार करण्याचे ठरवले आणि हा रस्ता करीत असतानाच त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा रोज एक वडाचे झाड लावण्यास सुरुवात केली. या चार किलोमीटरच्या रस्त्यावर सुमारे 384 झाडे त्यांनी लावली आणि जोपासली. त्यांच्या कार्याची हीच प्रेरणा घेऊनच हरित वारी संकल्पना अस्तित्वात आली.
गोशाळेतून मिळणाऱ्या खताचा वापर
पंढरपूर देवस्थानच्या असलेल्या गोशाळेतून सुमारे 25 ते 30 ट्रक शेणखत पूर्वी विकले जायचे, हेच खत आता या मार्गावरील वृक्षसंवर्धनासाठी उपयुक्त ठरते आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.
पडिक जमिनींचा होणार उपयोग
मंदिर समितीला वेगवेगळ्या ठिकाणांहून भाविकांनी 12 हजार हेक्टर जमिनी दानात मिळाल्या आहेत. यातील पडिक जमिनींवरही घनवनाचा संकल्प आहे.
“गेल्या दोन वर्षांत करोनाचा उद्रेक आणि सध्या दोन्ही पालखी महामार्गांवर होत असलेले रुंदीकरणाचे काम यामुळे वृक्षारोपण सध्या जरी कमी होत असले तरी आता पुढील काळात यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येईल. तसेच वृक्षलागवडीबरोबरणच या वृक्षांच्या संवर्धनासाठी तीन वर्षांची मुदतही घालण्यात आलेली आहे, त्यामुळे त्याचे चांगले परिणाम दिसून येतील.” – हभप शिवाजी महाराज मोरे, सदस्य, श्री विठ्ठल-रुक्मिणी समिती, पंढरपूर