पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी श्रीसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्यासह राज्यातील विविध भागांतून संतांचे पायी वारी पालखी सोहळ्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. यंदा पायी वारी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने वारकरी, भाविक सहभागी झाले आहेत. राज्य शासनाकडून स्वच्छतेच्या दृष्टीने “निर्मलवारी 2023′ हा उपक्रम राबवला जात आहे. मात्र; प्रत्यक्षात फिरते स्वच्छतागृह (चेलळश्रश ढेळश्रशीं) अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले आहेत. मोबाइल टॉयलेट वापरताना वारकऱ्यांना 3 ते 4 टॉयलेट पाहून शेवटी नाईलाजाने एका अस्वच्छ “मोबाइल टॉयलेट’चा वापर करावा लागत आहे. त्यामुळे निर्मलवारीचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.
वारीच्या मार्गांवर मोबाइल टॉयलेट बसविले आहेत. मात्र, वारकऱ्यांची लाखांच्या घरात संख्या असताना प्रशासनाकडून पुरवलेले मोबाइल टॉयलेट अपुरे पडत आहेत. त्यामुळे वारकऱ्यांची कुचंबणा होत आहे. पालखी मार्गावर हा मुक्काम ज्या गावात आहे, त्या गावात हे मोबाइल टॉयलेट बसविले आहेत. त्याठिकाणी राज्य शासनाकडून संबंधित ठेकेदारांना स्वच्छतेचा ठेका दिला आहे. मात्र, टॉयलेटची संख्या तोकडी पडत आहे, त्यामुळे गैरसोय होत आहे आणि निर्मलवारीचा हेतू खऱ्या अर्थाने साध्य होत नसल्याचे दिसून येत आहे.
पालखी सोहळ्यात प्रशासन, ग्रामस्थ आणि सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, सदस्यांचे हजारो हात राबत असतात. मात्र, सामाजिक बांधिलकीतून हे त्यांचे सेवाकार्य सुरू असते. यात या सामाजिक संस्था विनामोबदला काम करीत असतात. मात्र, राज्य शासनाने निर्मलवारीसाठी देण्यात आलेल्या ठेक्याचा हा हेतू साध्य होत नाही. हेच यातून प्रकर्षाने जाणवत आहे.
पालखी सोहळ्याने प्रस्थान ठेवल्यानंतर ठेकेदारांकडून हेच काम चांगल्या पद्धतीने होत नसल्याचे प्रत्येक वर्षी दिसून आले आहे. जुजबी कामे करीत उरकण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाकडून केवळ औषध फवारणीसह अन्य उपाययोजना केल्या जातात, त्यामुळे निर्मलवारीचा फज्जा उडाल्याचे दिसून येते असून आरोग्याच्या दृष्टीने ते अहितकारी
ठरत आहे.
काहींना कडीच नाही, काही तुटलेले
जे मोबाइल टॉयलेट वारीच्या वाटेवर ठेवण्यात आले आहेत. त्यातील काही टॉयलेटची अत्यंत दुरवस्था आहे. टॉयलेट नादुरुस्त आहेत. काहींचे दरवाजे लागत नाहीत तर काही वापरण्यासाठी अयोग्य आहेत. मोबाइल टॉयलेटशेजारीर पाण्याचा टॅंकर उभा केला जात आहे. पाण्याची व्यवस्था आहे. स्वच्छतेसाठी सफाई कामगारही आहेत. मात्र, वारीत वारकऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात असताना त्यातुलनेत मोबाइल टॉयलेटची संख्या अत्यल्प आहे. वारीच्या सुरुवातीच्या टप्पात हे प्रकार वारीसोबत असललेल्या “प्रभात’च्या प्रतिनिधींच्या निदर्शनास आले आहेत. अन्यही गैरसोयींचा सामना वारकऱ्यांना करावा लागतो आहे.
कायमस्वरूपी स्वच्छतागृहांची आवश्यकता
बहुतांश टॉयलेट हे अस्वच्छतेने माखले आहेत. लाखोंचा समुदाय आणि टॉयलेटची अल्पसंख्या यामुळे वारकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पुढील काळात पालखी महामार्गावर पालखी सोहळा मुक्कामाचे ठिकाण, विसाव्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी स्वच्छतागृह उभारण्याची आवश्यकता आहे.
ग्रामपंचायतींना निधी दिल्यास...
पालखी मार्गावर विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी निर्मलवारीचा हेतू सफल करण्यासाठी राज्य शासनाने ठेका न काढता ग्रामपंचायतींना जादा निधी देण्याची मागणी होत आहे. यातून ग्रामपंचायत पातळीवर याचे नियोजन योग्य होईल, अशी प्रतिक्रिया तरूण वारकऱ्यांनी यावेळी दिली. निर्मलवारीसाठी निधींची तरतूद ग्रामपंचायतींना करून दिल्यास कायमस्वरूपी तसेच फायबरचे टॉयलेट त्या गावांत कायमस्वरूपी होईल, तसेच शासनाचा उद्देश सफल होईल, अशी प्रतिक्रिया पालखी मार्गावरील गावांतून उमटली.