पुणे – आषाढी वारी पालखी सोहळा अवघ्या वीस दिवसांवर येऊन ठेपला आहे. वारकऱ्यांची गैरसोय टाळा, त्यांना सुविधा पुरवा,असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधित स्थानिक प्रशासन यंत्रणांना दिले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील हवेली आणि पुरंदर तालुक्यातील पालखी तळ, विसावा याठिकाणी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी भेटी घेऊन तयारीचा आढावा घेतला. तसेच आवश्यक त्या सूचनाही दिल्या.
यामध्ये प्रामुख्याने पुणे-सासवड-जेजुरी-नीरा याठिकाणी भेटी दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, हवेलीचे प्रांताधिकारी संजय आसवले, दौंड-पुरंदर उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, श्री संत ज्ञानदेव महाराज देवस्थान आळंदीचे पदाधिकारी, हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे, राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता अभिजित औटी उपस्थित होते.
औषध, पाणी आणि विजेला प्राधान्य द्या –
यंदा एक महिना अगोदर 11 जून रोजी पालखीचे प्रस्थान होणार असल्याने उन्हाचा त्रास वारकरी भाविकांना होऊ नये, यासाठी आवश्यक त्या औषधांची व्यवस्था ठेवावी. पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा करण्यास प्राधान्य द्या, तसेच फिरत्या शौचालयांची व्यवस्था आणि वीज सुविधा प्राधान्याने पुरविण्यात यावी, असे निर्देश डॉ. देशमुख यांनी दिले. पालखी मार्गावर वारकऱ्यांना चालताना कोणताही त्रास होवू नये, यासाठी पालखीमार्गाच्या साईडपट्ट्या भरून घेण्यासह खड्डे तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणी मुरूम व अन्य पर्यायांचा वापर करुन डागडुजी करावी.
पालखी विसाव्याची व्यवस्था चोख ठेवा…
पालखी विसावा, मुक्काम असलेल्या गावातील पिण्याच्या पाणी योजनांसाठी अतिरिक्त राखीव पंप ठेवावेत. टॅंकर वाढवावेत. ऐनवेळी तांत्रिक अडचणी येऊ नयेत, म्हणून पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी. मार्गात आवश्यक तेथे पाण्याच्या टाक्या ठेवाव्यात, असा सूचना दिल्या. दरम्यान, दिवे घाटाचा टप्पा पार केल्यानंतर झेंडेवाडी विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांना मोठा विसावा घ्यावा लागतो. त्याठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध व्हावी म्हणून प्रशासनाने शेजारील खासगी जमीनधारकांशी संपर्क साधून व्यवस्था करावी. तसेच सासवडजवळील बोरावके मळा विसावा, वाल्हे पालखीतळ, नीरा पालखी विसावा या स्थळांची पाहणी केली.
पालखी मार्गावरील अत्यावश्यक कामे पूर्ण करण्याच्या सूचना…
– पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत ठेवावा; पर्यायी व्यवस्था असावी
– कऱ्हा नदीवरील पुलाच्या कामाला गती देऊन काम पूर्ण करावे
– जेजुरी पालखीतळाच्या सीमाभिंतीचे काम वेळेत पूर्ण करा
– नीरा नदीवरील पुलाच्या संरक्षक कठड्यांची दुरुस्ती तत्काळ करावी
– हवेली तालुक्यात ऊरुळी देवाची पोलीस ठाण्याजवळील विसाव्याच्या ठिकाणाची डागडुजी करावी
घाटामध्ये कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई
दिवे घाटामध्ये कचरा टाकण्यात येत असल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने घाटामध्ये गस्त घालण्यात यावी, असे प्रकार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही डॉ. देशमुख यांनी दिले.