मुंबई – महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाचा सत्तासंघर्षावर जो निकाल आला त्यानंतर झालेली ही पहिलीच भेट आहे. मागच्या काही दिवसांपासून घडलेल्या घडामोडी पाहता ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाचा निकाल देत असताना तेव्हा राज्यपालांची भूमिका संशयास्पद होती, असे म्हटले होते. त्यानंतर कोश्यारींच्या विरोधात प्रतिक्रियाही आल्या होत्या. या सर्व घडामोडी झाल्यावर भगतसिंह कोश्यारी वर्षा बंगल्यावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
भगतसिंह कोश्यारी हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी विविध राजकीय नेत्यांची भेट घेतली. मात्र एकनाथ शिंदे यांची भेट घेणे हे महत्त्वाचे मानले जात आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ओघवती प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आपण फारसं भाष्य करु इच्छित नाही, असेही त्यांनी म्हटले होते. अशात ते वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने विविध प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
दरम्यान, भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल असताना त्यांचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारसह अनेक खटके उडाले होते. महाविकास आघाडीने अनेकदा कोश्यारींची राज्यपाल पदावरुन हकालपट्टी करा, अशीही मागणी केली होती. अशात सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावर जो निकाल दिला त्यानंतर कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा या निवासस्थानी घेतली आहे. ही सदिच्छा भेट होती असे सांगण्यात येत आहे. मात्र राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.