यवत (प्रतिनिधी) : पहाटेचा मंद गारवा…, भक्तीगीतांचा जागर…, ‘तुकोबा तुकोबा’ असा नामघोष करीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळा श्री काळभैरवनाथ मंदिर यवत येथून पंढरपूर कडे मार्गस्थ झाला. सुहाना मसाला कंपनी पर्यंत चालत जाऊन यवतकरांनी पालखीला निरोप दिला. दिंड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आणि सकाळनंतर पालखी मार्गावर हरिनामाचा अखंड जयघोष सुरू होता.
आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू येथून पंढरपूरकडे निघाला आहे. शनिवारी सायंकाळी सोहळा यवत मुक्कामी पोहोचला होता. दिंड्या व वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था शाळांमध्ये केली होती. मात्र, पाऊस नसल्याने अनेक वारकरी पुणे-सोलापुर महामार्गाच्या पदपथावरच रात्रभर मुक्कामी होते. पहाटे पाच वाजता पादुकांचा अभिषेक, महापूजा व आरती करण्यात आली. या वेळी पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्तांचा सन्मान करण्यात आला. ज्ञानोबा-तुकाराम गजर करत पालखी खांद्यावर घेत गावातुन प्रदिक्षणा करुन जि.प. शाळेजवळ दर्शनासाठी ठेवण्यात आली यानंतर पालखी रथात ठेवून सोहळा मार्गस्थ झाला. रस्त्याच्या दुतर्फा थांबून भाविकांनी दर्शन घेतले.
‘ज्ञानोबा तुकाराम’ जयघोष करत आणि ‘टाळ मृदंगाचा गजर’ सुरू होता.अनेकांनी ठिकठिकाणी चहा, नाश्त्याची सोय केली होती.
सकाळी ८ वाजता पालखीने टाळ मृदूंगाच्या गजरात वरवंड कडे प्रस्थान केले.
यावेळी सरपंच समीर दोरगे,उपसरपंच सुभाष यादव,सुरेश शेळके, सदानंद दोरगे,नानासाहेब दोरगे, कुंडलिक खुटवड,गणेश कदम, गणेश शेळके,शंकर दोरगे, सतीश दोरगे,श्यामराव शेंडगे,सतीश दोरगे प,दत्तात्रय दोरगे,मयूर दोरगे,रोहन दोरगे,कैलास दोरगे,काका दोरगे समस्त ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी, शासकीय अधिकारी,कर्मचारी, पोलिस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.