पुणे – पंढरीच्या वारीसाठी जाणाऱ्या देहू आणि आळंदीच्या पालख्यांचे विसावा तळ आणि मुक्कामाच्या ठिकाणी वारी पुढील मुक्कामी मार्गस्थ झाल्यावर खऱ्या अर्थाने काम करावे लागते. या तळांची स्वच्छता आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची समस्या लक्षात घेऊन आळंदीतील “स्वकाम सेवा संस्थे’चे होणारे कार्य उल्लेखनीय ठरते आहे.
पालख्यांच्या विसाव्याच्या आणि मुक्कामाच्या ठिकाणी हार-फुलांसह निर्माल्याचे ढीग लागतात. या ठिकाणी अन्न शिजवले जाते किंवा अन्नाचे वाटप केले जाते. अशावेळी उरलेले अन्न तसेच टाकून देऊन नागरिक मार्गस्थ होतात. या कारणांमुळे येथील परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरते. पर्यायाने आरोग्याच्या समस्याही निर्माण होतात. आळंदीतील “स्वकाम सेवा संस्थे’ने यातून मार्ग काढत हे सर्व तळ स्वच्छ करण्याचे काम 1996 पासून सुरू केले आहे. जवळपास 28-29 वर्षे संस्थेतर्फे हे काम अविरत सुरू आहे. या संस्थेत या कार्यासाठी 1400 सेवक जोडले गेले आहेत. सर्व वयोगटांतील सेवक यात काम करतात. निःशुल्क सेवा हेच या संस्थेचे वैशिट्य आहे.
नगर जिल्ह्यातील क्षीरसागर महाराज यांच्या प्रेरणेने संस्थापक गुरुवर्य डॉ. सारंग जोशी यांनी 1996 साली माऊलीच्या आळंदीत काम करण्यास सुरुवात केली. आजही ती अविरतपणे सुरू आहे. वारी मार्गावरील मंदिर, तेथील परिसर, सभामंडप, मंदिराचे कार्यालयीन कामकाज, स्वच्छतागृह, पार्किंग, आणि इतर या ठिकाणी सेवा सुरू असते. हीच ईश्वरसेवा अशा भावनेने गरज पडेल त्या सेवेसाठी कार्यकर्ते तत्पर असतात. वारी सोहळा आता सुरू झाला आहे. लाखो वारकरी आळंदी, देहू, पंढरपूर येथे जमा होत आहेत. प्रत्येक जण मंदिरात जाऊन दर्शन घेतात, सेवा अर्पण करतात. या काळात मंदिरांचे आरोग्य खऱ्या अर्थाने बिघडते आणि पूर्ववत करण्याचे काम “स्वकाम’ करते आहे.
या कामाचे नियोजन पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत सेवेकरींकडून आळीपाळीने केले जाते. घरची कामे सांभाळून सेवा अर्पण करण्यास सर्व कार्यकर्ते तयार असतात. प्रत्येक कार्यकर्ता सेवेची संधी कधी मिळते याची वाट पाहत असतो. प्रत्येक गावात मंदिरे असतात, ती स्वच्छ करण्यासाठी एक समूह तयार होणे गरजेचे आहे. यामुळे मंदिरे सुस्थितीत राहतील, आमच्या कामातून अनेक लोकांनी प्रेरणा घ्यावी आणि मंदिरे स्वच्छ ठेवावीत, हीच इच्छा आहे.
सुनील तापकीर,अध्यक्ष,
स्वकाम सेवा संस्था, आळंदी