देहूगाव – जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी 337 व्या पायीवारी पालखी सोहळ्याच्या पालखी रथासाठी 2 बैल जोड्या तर चौघडा गाडीसाठी एक बैल जोडी निवडण्यासाठी बैलजोडी मालकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. बुधवारी (दि.18) व गुरुवारी ( दि.19 )असे दोन दिवसांमध्ये सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत संस्थाच्या कार्यालयात हे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जगद्गुरू श्री संत श्री तुकाराम महाराज यांचा 337 वा पालखी सोहळा सोमवार 20 जून रोजी तीर्थक्षेत्र देहू येथुन प्रस्थान होणार आहे. सुमारे पस्तीस दिवसांच्या प्रवासानंतर रविवारी दि. 24 जुलै रोजी देहूत पुनरागमनाने पालखी सोहळ्याचा समारोप होईल. या पालखी सोहळ्यातील सुमारे दोन टन वजनाचे पालखी रथासाठी निरोगी, धष्टपुष्ट, टोकदार शिंगे, वशिंड ,पांढराशुभ्र देखण्या दोन बैलजोड्यांची तपासणी करून निवड करण्यात येणार आहे. तसेच पालखी सोहळ्यातील चौघडा गाडीसाठी एक बैलजोडीची निवड करण्यात येणार आहे.
या निवडीसाठी बैल मालकांकडून बुधवार ( दि.18 ) व गुरुवार ( दि.19 ) असे दोन दिवसात सकाळी दहा ते पाच या कार्यालयीन वेळेत संस्थानच्या कार्यालयामध्ये अर्ज स्विकारले जाणार असल्याची माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे,पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे,संतोष महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.