मुंबई – कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा दणका सुरूच असून, अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. पालघर, ठाणे, रायगड, पुण्याच्या घाटमाथ्यावर “रेड अलर्ट’ तर मुंबई, रत्नागिरी आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर “ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर सिंधूदुर्ग, नंदूरबार, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट), उर्वरित विदर्भात विजांसह पावसाचा, तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसात भंडारा जिल्हाच्या पवनी तालुक्यातील चिचाळ गावात वीज कोसळून तब्बल 20 महिला जखमी झाल्याचा प्रकार घडला. तर, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून सद्यस्थितीत नद्या, नाले, ओढे भरून वाहत आहेत. हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 32.70 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 277 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे यांनी दिला. तर नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
कोल्हापुरात उघडझाप
गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी पावसाने उघडझाप दिली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होणारी वाढ काहीशी मंदावली आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत पंचगंगेची पाणी पातळी 35 फुट 2 इंच होती. दुसरीकडे राधानगरी धरणात 70 टक्क्यांच्या घरात पाणीसाठा झाला आहे. इतर धरणांमध्येही गेल्या चार दिवसांपासून झालेल्या पावसाने पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील प्रमुख 15 प्रकल्पापैकी 3 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. जिल्ह्यातील राधानगरी, वारणा, कासारी, घटप्रभा, जांबरे आणि कोदे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. सर्वाधिक विसर्ग घटप्रभा प्रकल्पातून 5134 क्युसेकने विसर्ग होत आहे
मराठवाड्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा
मराठवाड्यातदेखील गेल्या दोन-तीन दिवसांत अनेक भागात पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. हवामान विभागाने शुक्रवारी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. उर्वरित जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरी बरसतील. राज्यात सर्वत्र दमदार पाऊस होत असताना मराठवाड्यात मात्र कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांना जीवनदान मिळाले असले तरी मराठवाड्यातील अनेक प्रकल्प अजूनही कोरडे आहेत. त्यामुळे आगामी काळात लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे मराठवाड्यात अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.
राज्यातील पाऊस दृष्टीक्षेपात
मुंबईतील दादर, किंग्स सर्कल, माटुंगा व सायनमधील काही सखल भागांत साचले पाणी.
कोकणातील वरंधा घाटातून अवजड वाहतूक बंद. रायगड व पुणे प्रशासनाचा संयुक्त मोठा निर्णय.
नांदेड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी 64.80 मिमी मुसळधार. बिलोली, देगलूर व मुखेड तालुक्यात पूरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला.
रायगड जिल्ह्यात रोह्याकडून तळ्याकडे येणारा रस्ता बंद.
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे शाळा बंदच.
मुंबईत शनिवारी शाळा सुरू राहणार. पावसाची परिस्थिती पाहून इतर निर्णय घेणार- प्रशासनाची माहिती.
पुण्याच्या आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, पुरंदर, मुळशी, मावळ या तालुक्यातील दुर्गम क्षेत्रातील 355 शाळा शनिवारीही बंद.