नवी दिल्ली –दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा लोकसभा निवडणुकीवर कुठलाही परिणाम होणार नाही. दिल्ली शहराचे वास्तूशास्त्र भाजपला अनुकूल आहे. पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीतही दिल्लीत कमळ फुलेल, असा दावा भाजपच्या नेत्या बांसुरी स्वराज यांनी शुक्रवारी केला. (Arvind Kejriwal’s arrest will not affect elections, claims Bansuri Swaraj)
दिग्गज नेत्या दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या असणाऱ्या बांसुरी यांना भाजपने नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. बांसुरी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेच्या मुख्यालयात संपादकांशी संवाद साधताना भाजपच्या चांगल्या कामगिरीबद्दल विश्वास व्यक्त केला. अबकी बार ४०० पार, फिर एक बार मोदी सरकार एवढा एकच परिणाम केजरीवाल यांच्या अटकेमुळे दिसेल, असे त्यांनी म्हटले.
केजरीवाल यांच्या अटकेच्या माध्यमातून आपला संपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप तो पक्ष करत आहे. त्याविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना बांसुरी यांनी केजरीवाल आणि आपवर टीकास्त्र सोडले. केजरीवाल हे कसलेले राजकारणी आहेत. त्यांनी अटकेसाठी निवडणूक जवळ आल्याची वेळ निवडली. सहानुभूती मिळवण्याचा त्यामागे प्रयत्न आहे. मात्र, दिल्लीतील जनता केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराला विटली आहे, असे त्या म्हणाल्या.