नवी दिल्ली : जिद्द आणि प्रतिकूलतेसमोर हार न मानणे हे डॉ. अरुणिमा सिन्हा यांचे वैशिष्ट्य आहे. रेल्वेत गुंडांशी सामना, गुंडांनी चालत्या रेल्वेतून फेकून दिल्यामुळे पाय गमवावा लागल्यानंतरही अफाट इच्छाशक्तीच्या बळावर एव्हरेस्ट आणि अन्य पर्वतशिखरे सर करण्याचे उद्दीष्ट पूर्ण करणाऱ्या अरुणिमा यांनी नुकताच गोंडस बाळाला जन्म दिलेला आहे.
पाय गमावल्याने दिवांग्यत्व येऊनही अरुणिमा यांनी एव्हरेस्ट पर्वतावर तिरंगा फडकावला आता त्यांनी आयुष्यातील आणखी एक ध्येय गाठलेले आहे आणि ते म्हणजे आई होण्याचे. विशेष म्हणजे फरिदाबादमधील शासकीय रुग्णालयात त्यांचे बाळंतपण पार पडले. मागील पंधरा दिवसांपासून त्यांना रुग्णालयात डॉ. प्रोणिता अहलावत यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आले होते. त्यासंदर्भातील सगळी माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. शेवटी कोणत्याही शस्त्रक्रियेविना प्रसूती झाल्याबद्दल अरुणिमा यांनी डॉक्टरांना धन्यवाद दिले आहेत.
विशेष म्हणजे प्रसूतीसाठी लखनौ, दिल्ली, गुरुग्रामधील प्रसिद्ध आणि खासगी रुग्णालये असताना त्यांनी शासकीय रुग्णालयाला प्राधान्य दिले त्यामागील कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. या प्रसिद्ध आणि खासगी रुग्णालयांनी त्यांना नैसर्गिकरित्या प्रसूती होण्याबाबत नकार दिला होता. त्यांचे म्हणणे होते की, की हाय रिस्क प्रेगनन्सी केस आहे. मात्र जिद्दी आणि प्रतिकूलतेवर मात करण्याची हिंमत असणाऱ्या अरुणिमा यांनी शासकीय रुग्णालयात दाखल होऊन नैसर्गिरित्या प्रसूतीद्वारे गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्यासाठी फरिदाबाद जिल्हा बादशाह खान शासकीय रुग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. प्रोणिता अहलावत, रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय गुप्ता यांचे सहकार्य लाभले.
डॉ. विनय गुप्ता यांनी सांगितले की, 22 ऑक्टोबर रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला आणि सरकारी रुग्णालयात प्रसूती करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली. त्यांनी अरुणिमा यांचे वैद्यकीय रिपोर्ट मागवले आणि स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. प्रोणिता अहलावत यांना दाखवले. त्यांनी मान्यता दिल्यानंतर गुप्ता यांनी अरुणिमा यांना होकार कळवला. डॉ. प्रोणिता यांनी अरुणिमा यांना धीर दिला आणि सगळे काही व्यवस्थित असेल व बाळ व मातेच्या जीवाला धोका ऩसेल तर नैसर्गिकरित्या प्रसूती करण्यात येईल असे सांगितले. त्यांच्या सांगण्यानुसार बाळाच्या गळ्यात दोन लूप आणि एक गाठ होती. अशा स्थितीत बाळाला ओढण्यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. त्यामुळेच अन्य रुग्णालयांनी नैसर्गिक प्रसूतीला नकार दिला होता. सगळे काही सुरळीत पार पडले आणि अरुणिमा यांनी नैसर्गिक प्रसूतीद्वारे बाळाला जन्म दिला. आता आई आणि बाळ दोघांची प्रकृती चांगली आहे.
अरुणिमाच्या सांगण्यानुसार रेल्वेतून फेकल्यामुळे झालेल्या गंभीर जखमांमुळे इतक्या वेळा शस्त्रक्रिया सहन केल्या आहेत की आता सीझेरियन करण्याची त्यांच्या मनाची तयारी नव्हती. त्याचवेळी त्यांचे मन त्यांना सांगत होते की, आतापर्यंत इतक्या गंभीर परिस्थितीवर आणि जखमांवर मात केली आहे की, त्यापुढे नैसर्गिक प्रसूती काहीच नाही. त्यामुळेच मी याप्रकारच्या प्रसूतीला पसंती दिली. देवाच्या कृपेने सगळे काही व्यवस्थित पार पडले. त्याचबरोबर शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि व्यवस्था सर्वोत्तम असून त्यांच्याविषयीची नकारात्मक भावना दूर केली तरच खासगी रुग्णालयांची मनमानी कमी होईल.
1988 मध्ये जन्मलेली अरुणिमा सिन्हा ही व्हॉलीबॉलची राष्ट्रीय खेळाडू होती. 11 एप्रिल 2011 रोजी ती पद्मावती एक्सप्रेसने सीआयएसएफमध्ये भरती होण्यासाठी दिल्लीला जात होती. त्यावेळी काही गुंडांनी रेल्वेत शिरून तिच्याकडील मोबाईल आणि गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तिने त्यांना विरोध केला तेव्हा त्यांनी तिला बरेलीजवळ रेल्वेतून फेकून दिले. ती शेजारील समांतर रेल्वेरूळावर पडली. तिला उठताही येत नव्हती. त्याचवेळी त्या रुळावरून आलेल्या ट्रेनखाली तिचा पाय सापडल्याने तो गुडघ्यापासून तुटला. नंतर तिच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार करण्यात आले. यासगळ्यातून बाहेर पडल्यावर तिने जिद्दीच्या जोरावर अनेक शिखरे सर केली. 2015 मध्ये पद्मश्री पुरस्काराने तिच्या जिद्दीचा गौरव करण्यात आला. गिर्यारोहक गौरव सिंगबरोबर तिने लग्न केले आहे.