कलमकारीमधे खरोखरच पूर्वीच्या काळच्या दौत आणि टाक किंवा बोरू या साधनांनी जसं लिहिलं जायचं तसेच कलम म्हणजेच पेन वापरुन चित्रं काढली जातात. हे कलम बांबूच्या बारीक काडीचे तयार केलेले असतात. बांबूची काडी एका बाजूला टोकदार केली जाते. नंतर तिच्या मध्यावर कापूस किंवा लोकर बांधली जाते. हा तयार झालेला कलम मग रंगात बुडवला जातो. त्याच्यावरची लोकर रंग शोषून घेते. मग चित्रात रंग भरताना चित्रकार हातानं दाब देईल तसा रंग हळूहळू कापडावर उतरतो. यामध्ये टोकदार बांबू ही चित्राची बॉर्डर तयार करायला वापरतात तर थोडी जाड टोकं असलेले बांबू चित्रामध्ये रंग भरायला वापरतात.
कलमकारीमध्ये कापडावर चित्रं काढताना त्यात वेगवेगळे तेवीस टप्पे येतात. सर्वात आधी कापड गायीचं शेण, म्हशीचं दूध आणि पाण्यात भिजवून ठेवून नंतर धुतली जातात. त्यामुळे कापडाला एकसंध पिवळट रंग येतो. नंतर त्यावर चिंचेच्या जाळलेल्या काडीनं रफ स्केचेस केले जातात कारण ते खोडता येतात. आणि नंतर ती गुळ आणि लोखंडाच्या चुरा एकत्र करुन तयार केलेल्या काळ्या रंगानं त्या चित्राची बॉर्डर तयार करतात. ही मात्र आता खोडता येत नाही. त्यानंतर कापड पुन्हा तुरटीच्या पाण्यात धुतलं जातं. नंतर नक्षी तयार केली जाते. आणि त्यानंतर या चित्रामध्ये लाल, निळा, हिरवा, पिवळा असे रंग भरले जातात. हे रंग निळ, वेगवेगळी पानं, फुलं, हळकुंड असे नैसर्गिक पदार्थ वापरुन तयार केलेले असतात. हे पाहाताना आपल्याला कागदावर केलेल्या चित्रकलेचीच आठवण येते पण आपण कागद कधीही धूत नाही आणि अंगावर घालायचा कपडा एकदा किंवा दोनदा धुवावा लागतो. मग ही चित्रं कापडावर टिकण्यासाठी आणि धाग्यांनी त्यावरचे रंग शोषून चित्राच्या सीमेबाहेर कापडावरच पसरू नये यासाठी काय करतात हेच या कलेचं सर्वात मोठं कसब आहे. या सगळ्यांमध्ये कापड अनेकदा नदीच्या वाहत्या पाण्यात धुतलं जातं. त्यामुळेच हे कलाकार सुवर्णमुखी नदीकाठी वसले यालाही हे कारण आहे. हे दिसायला सोपं असलं तरी खूपच किचकट आणि वेळखाऊ काम असतं. त्यामुळे ही कलमकारी केलेली कापडावरची चित्रं अनेकवेळा धुवूनही शतकानूशतकं टिकतात हेच याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे.
हल्ली कलमकारी गुजरातमध्येही तयार केली जाते. तिथे शक्यतो कृष्णार्जुनाच्या आणि विष्णूच्या कथांमधल्या दृष्यांची चित्रं काढली जातात. तर आंध्रप्रदेशात वेगवेगळी मंदिरं, किल्ले, पशू-पक्षी आणि निसर्गचित्रं काढली जातात.
मुघलांच्या काळात बहरलेल्या या कलेला इंग्रजांच्या काळात इतर कलांप्रमाणेच याही कलेला परत ओहोटी लागली होती. पण स्वातंत्र्यानंतर कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या प्रयत्नांनी बंगाली बालुचारी साडीप्रमाणेच याही वस्त्रपरंपरेला जीवदान मिळालं. पण त्यानंतर आलेल्या पावर लूम्स (यंत्रमाग) आणि प्रिंटींगच्या तंत्रामुळे याही हस्तकलेला स्पर्धा निर्माण झाली. तरीही आंध्रप्रदेश आणि तेलंगणामधे आजही अनेक कुटुंबं ही पंरंपरा जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. उलट तेही आता इंटरनेटचा उपयोग करुन आपल्या कलेची जाहिरात करतात आणि मूळ कलाकृती सर्वत्र पोहोचवायचा प्रयत्न करतात.
कॉम्प्युटर्समुळे हल्ली प्रत्येक गोष्ट हवी तशी डिझाईन करता येते. शिवाय हातानं काढल्यापेक्षा हे काम कमी वेळातही पूर्ण होतं. पण याचा तोटा असा की अशाप्रकारे एकाच वेळी अनेक कापडं फक्त प्रिंट होतात. त्यात वैविध्य काहीही नसतं आणि थोड्या थोड्या अंतरावर तीच नक्षी पुन:पुन्हा येते. त्यामुळे त्यातला एकमेवपणा आणि वैयक्तिकपणा (युनिकनेस आणि पर्सनल टच) निघून जातो. शिवाय हातानं तयार केलेल्या वस्त्राला एक वेगळा पोत आलेला असतो जो एकाच टप्प्यात प्रिंट केलेल्या कापडावर येत नाही. त्यामुळेच तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी ते हस्तकलेची जागा घेऊ शकत नाही, हे मात्र खरं.
अमृता देशपांडे