या विश्वाच्या निर्मात्याने प्रत्येक गोष्ट काही विशिष्ट हेतूने जन्माला घातली आहे. नदी असो, समुद्र असो, आभाळ असो, माती असो, डोंगर-दऱ्या असोत, झाडे-झुडपे असोत, पशु-पक्षी असोत, दगड-धोंडे असोत, मनुष्यप्राणी असो, प्रत्येक गोष्ट निर्मिण्यामागे त्या आदिशक्तीचा काही हेतू आहे. प्रत्येकाने आपल्या निर्मितीमागचं कारण ओळखून वागायला हवं. समुद्राने त्याचा खारटपणा सोडून दिला तर मीठ कोठून येईल? मिठाच्या अतिवापराने आयुष्याला खारटपणा येतोच पण त्याच्या योग्य वापराने जीवनाला चव येते. नदीने तिचा गोडवा सोडून दिला तर तिच्या काठावर गावे कशी वसतील? जनावरे पाणी प्यायला कोठे जातील? आभाळाचं अस्तित्व नसतं तर चांदण्यांची शीतलता कशी अनुभवता आली असती? माती नसती तर आपण कशाच्या आधारावर उभे राहिलो असतो? झाडाच्या मुळांना कुशीत कुणी घेतलं असतं? डोंगर दऱ्या नसत्या तर धबधबे कसे दिसले असते? वन्य प्राण्यांना आसरा कुठे मिळाला असता? झाडेझुडपे नसती तर वाटसरूला सावली कशी मिळाली असती? पाखरांनी घरटी कुठे बांधली असती? पशु, पक्षी नसते तर कोकिळेच्या गाण्यातला आणि वाघाच्या डरकाळीतला फरक कसा समजला असता? दगड धोंडे नसते तर घरं कशी बांधली असती? देवाच्या मूर्त्या कशातून घडवल्या असत्या? आणि माणूस नसता तर… ? माणूस नसता तर ही कल्पना न केलेलीच बरी.
हे सगळं मनात यायला एक कारण घडलं.
पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सेवापुर्ती सोहळा होता. सप्टेंबर महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या पालिकेच्या सर्व वर्गातील 37 कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार होता. मी आणि कवी उद्धव कानडे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो. पालिकेच्या कामगार कल्याण विभागाचे प्रमुख श्री. शिवाजीराव दौंडकर, श्री. केंजळे असे काही अधिकारी व्यासपीठावर होते. त्या कौतुक सोहळ्यास सेवापुर्ती झालेले सर्व कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. विना विघ्न आपण आपली सेवा पूर्ण केली याचा आनंद सगळ्यांच्याच चेहऱ्यावर झळकत होता.
उद्धव कानडे यांनी त्यांच्या व्याख्यानात प्रामाणिक सेवेचे महत्त्व अधोरेखित केले. फ्रान्सच्या राष्टगीताचा जन्म कसा झाला ते सांगितले. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा एक ऑर्डर्ली होता. पहारेकरीच तसा तो दारावरचा. काम नसेल तेव्हा कागदावर काहीतरी लिहायचा. राष्ट्राध्यक्ष आले की कागद खिशात ठेवून द्यायचा. पण एक दिवस साहेब आल्याचे बघून तो त्यांची केबिन नीटनेटकी करण्यासाठी आत गेला. गडबडीत कागद दाराबाहरेच्या त्याच्या खुर्चीवर तसाच राहिला. राष्ट्राध्यक्ष आले. त्यांनी त्या ओळी वाचल्या. आणि त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला. कारण त्या कागदावर देशप्रेमाने ओथंबून वाहणाऱ्या ओळी होत्या. झालं त्यांनी निर्णय घेतला आणि एका पहारेकऱ्याने लिहिलेले गीत त्या देशाचे राष्ट्रगीत झाले. प्रामाणिकपणे केलेल्या सेवेचे असेच असते. आपण अपेक्षा न ठेवताही त्या सेवेचे सोने होते.
माणूस जन्माने नव्हे कर्माने, प्रामाणिक सेवा केल्याने मोठा होतो. ते अधोरेखित करण्यासाठी उद्धव कानडे यांनी कवी नारायण सुर्वे यांच्या आयुष्याची चित्तरकथा सांगितली. मळक्या कपड्यात गुंडाळलेला एक जीव मुंबईच्या फुटपाथवर पडलेला होता. मजुरी करणाऱ्या गंगाराम यांनी ते बाळ पाहिलं. घरी आणलं. वाढवलं. शिकवलं. त्याला नाव दिलं. एक बेवारस पोर, नारायण गंगाराम सुर्वे म्हणून ओळखलं जाऊ लागलं. नारायण सुर्वे यांनी पुढे जाऊन मजुरांसाठी काम केलं. श्रमिकांच्या कविता लिहिल्या. त्यांच्या साहित्याची दखल घेत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. त्यामुळेच उद्यापासून तुमच्या हाती जो मोकळा वेळ मिळणार आहे तो सत्कारणी लावा. तुमचे छंद जोपासा. आजवर ज्या नात्यागोत्यांना वेळ देऊ शकला नसाल तो द्या. आनंदात आयुष्य घालवा.
व्याख्यान संपलं. शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सर्व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं. अनेकांनी ते क्षण आपल्या मोबाइलमध्ये कैद केले. एकमेकांचे अभिनंदन केले. परस्परांना आलिंगन दिले. आम्ही तिथून बाहेर पडलो. पण माझ्या मनात विचारांचा कल्लोळ सुरू झाला. निसर्ग कधीच सेवानिवृत्त होत नाही. तो सेवेच्या बदल्यात काही मागत सुद्धा नाही. नेमून दिलेलं कार्य करत राहणं एवढंच ठाऊक असतं निसर्गाला. तसं माणूस सुद्धा कधीच सेवा निवृत्त होत नसतो. आपल्या माणसांचं कौतुक करणं, त्यांना हवं नको पाहणं याही सेवाच आहेत आपल्याला नेमून दिलेल्या. माणूस हातापायात त्राण असेल तोवर सेवा देत राहतो. महिला आजी होऊन नातवांना न्हाऊ घालतात. माहेरपणाला आलेल्या लेकीच्या कौतुकात बुडून जातात. आजोबा होत नातवांना बोटाला धरून मिरवतात. कधी नातवांना पाठीवर घेत घोडा होतात. आणखी एक सेवा अखंडपणे करत असतो आपण. देवाने दिलेल्या देहाला श्वास पुरवण्याची. शेतकरी आत्महत्या करतात. खरंतर आत्महत्या करण्याचा अधिकारच नाही माणसाला. जेव्हा कोणी तसे करतो तो या देहाला श्वास पुरवण्याची त्याला नेमून दिलेली सेवा नाकारतो. झाडाने ऑक्सिजन द्यायचे नाकारले तर चालू शकेल का आपल्याला?
सूर्य वर्षानुवर्षे प्रकाश देतो आहे. चांदणे शीतलतेची बरसात करत आहेत. ढग पाऊस देत आहेत. प्रत्येकजण आपल्याला नेमून दिलेली सेवा अविरत करतो आहे. मग आपण तरी सेवानिवृत्त कसे होऊ शकतो? झाडांना सरपण होऊन जळताना दुःख वाटत नाही मग समाजाची सेवा करताना आपल्या हाडाची काडं झाली तर बिघडलं कुठे? या देहाची कधी ना कधी माती होणार आहेच. झाडाच्या डहाळीवर उमलले फुल कधी ना कधी सुकणार आहेच. परंतु सुकून मातीत मिसळण्याआधी ते जगाला सुगंध देऊन जातेच ना! आपणही असंच अखेरच्या श्वासापर्यंत सेवा देत राहावं. दमलेली, खचलेल्या, अडलेल्या माणसांचा आधार व्हावं.
– विजय शेंडगे