लखनौ – गेल्या वर्षी भारतात नागरिकत्व दुरूस्ती कायदा अर्थात सीएएच्या विरोधात जोरदार निदर्शने झाली. दिल्ली नोएडा मार्गावर अनेक दिवस आंदोलन सुरू होते. करोना आला आणि आंदोलकांना उठावे लागले. कायदा योग्य की आयोग्य हा नंतरच प्रश्न. मात्र त्या आंदोलनानंतर काही लोकांची आज अत्यंत दयनीय स्थिती झाली आहे. ज्यांना अटक झाली त्यांच्या कोर्ट कचेरीसाठी घरच्या मंडळींनी घरातले होते नव्हते ते विकले. आता सुटका झाली मात्र कमाईचे कोणतेच साधन नाही, त्यामुळे या कुटुंबांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे.
लखनौमधील तौसिफ हा त्यातीलच एक युवक. तौसिफ रिक्षा चालवतो. मात्र आंदोलनानंतर झालेल्या धरपकडीत त्याला अटक करण्यात आली. तब्बल 9 महिन्यांनंतर आता त्याची सुटका झाली आहे. मात्र अगोदर तुरूंगात आणि आता सुटका झाल्यावरही यातना संपल्या नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.
मुळात या आंदोलनाशी आपला संबंधच नव्हता, असा तौसिफचा दावा आहे. ज्यावेळी सदर प्रकार घडत होता, त्यावेळी आपण आपल्या आजोळी गेलो होतो असे तो सांगतो. मात्र अचानक एक दिवस पोलीस घरी आले व त्यांनी आपल्याबाबत चौकशी सुरू केली. मी तेथे नसल्यामुळे त्यांनी काकाच्या मुलाला सोबत नेले. तौसिफला आणा आणि या मुलाला घेउन जा असे पोलिसांनी सांगितले. नंतर तौसिफला अटक झाली.
त्याच्या म्हणण्यानुसार त्याला तुरूंगात टॉर्चर करण्यात आले. अट्टल गुन्हेगारांसोबत त्याला ठेवले होते व त्यावेळी अश्रूंना वाट करून देण्याशिवाय वेगळे काही आपण करू शकत नव्हतो.
घरच्या मंडळींनी कोर्ट कचेरी केली व अखेर 9 महिन्यांनी त्याची सुटका झाली. आता काम नाही. घरात कोणी कमावता नाही. घरखर्चाला आणि खायला पैसे नाहीत. त्यातच घराच्या जप्तीची नोटीसही आलेली अशी वेदनादायी कथा आणि व्यथा तौसिफने सांगितली.
मात्र आता आपण आपला खटला संपण्याची वाट पाहत आहोत. त्यानंतर कुठेतरी अरब देशात जाउन काम करण्याचा आणि पैसे कमावण्याचा विचार असल्याचे तो म्हणतो.