राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – खेड तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या जोरदार पावसामुळे आरळा, भीमा नदीला पूर आला आहे. तर चासकमान धरणातून भीमा नदीत 7 हजार 605 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
त्यामुळे धरणाखालील नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, पावसाचा जोर वाढल्यास जादा क्षमतेने विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती धरणाचे अभियंता प्रेमनाथ शिंदे यांनी दिली.
खेड तालुक्यात आज पावसाचा जोर वाढला आहे सकाळी पासून जोराचा पाऊस झाला तर दुपारी अतिजोरदार पाऊस पडल्याने धरणात जादा क्युसेकने पाणी जमा होत होते. धरणातून सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास साडेसात हजार क्युसेकने पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे यामुळे धरणाखाली भीमा नदीला पुराचे स्वरूप आले आहे.
अभियंता प्रेमनाथ शिंदे म्हणाले की, चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असून धरणात येवा वाढल्यामुळे आज (दि. 13) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चासकमान धरणाच्या सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग 3685 वरून 7325 क्युसेक करण्यात आला आहे.
धरणाच्या विद्युत गृहातून 850 क्युसेकने विसर्ग सुरू असून त्यापैकी 570 क्युसेक डाव्या कालव्यातून सोडण्यात येत आहे. भीमा नदीत एकूण 7605 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी-जास्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.