पाबळ, (वार्ताहर) – 2024 मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूक ही महाराष्ट्रातील भाजप व भाजपेतर पक्षांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. प्राथमिक स्वरूपात शिरूर लोकसभा मतदारसंघात याची चाचपणी सुरू झाल्याची बाब पुढे येत आहे.
तीन आठवड्यांपूर्वी जुन्नरच्या पूर्वाश्रमीच्या शिवसेना नेत्या आशा बुचके यांनी भाजपात केलेला प्रवेश भाजपसाठी आशादायक आणि राष्ट्रवादी शिवसेनेसाठी आव्हानात्मक झाल्याची बाब राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे दौऱ्याने ठळक झाली असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान राज्यातील शिवसेनेचे सरकार अस्तित्वात आणण्यासाठी शरद पवार यांनी दिलेला समान कार्यक्रम त्रिपक्षीय सरकार टिकण्यास कारणीभूत ठरल्याची बाब स्पष्ट झाल्यानेच भाजपनेही शिवसेनेशी पुन्हा दोस्तीची बाब सोडून दिल्यात जमा आहे.
तरी महाराष्ट्रातील लोकसभेतील कामगिरी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना दिल्लीची रसद मिळण्यास कारणीभूत ठरणार असल्याने राज्यात लोकसभेसाठी अभूतपूर्व संघर्ष होणार हे नाकारता येणार नाही. दरम्यान कॉंग्रेसपेक्षा शिवसेनेशी घट्ट नाते जमलेले राष्ट्रवादीचे नेते वरिष्ठ पातळीवर निर्णयात अंतिम असले तरी स्थानिक ठिकाणी उमेदवारीसाठी होणारी रस्सीखेच किती शमवली जाते, यावर विजयाची मंदार अवलंबून आहे.
त्यातही शिरूर लोकसभा मतदारसंघात काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्वादीचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे की शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील एकमेकांच्या विरोधात की समनव्याने हा प्रश्न तितकाच महत्वाचा ठरणार आहे.
काही झाले तरी राष्ट्रवादीचा दावा आग्रही असला तरी आढळराव यांचीही आग्रही भूमिका असेल. यातून बरोबर तर जायचे पण थांबणार कोण? की नवीन खिलाडी येणार याच्या चर्चेला मोठे तोंड फुटले आहे. यातून मार्ग निघाला तरी भाजपचेही तगडे आव्हान या मतदारसंघात असणार आहे.
कदाचित याचीच चाचपणी करण्यासाठी शरद पवार आणि खासदार राऊत यांचा संयुक्त दौरा झाला असावा याची चर्चा आहे.
: लोकसभा निवडणूक ठरवणार गणिते
विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर सत्तेच्या दारात पोचलेल्या भाजपला सत्तेपासून विन्मुख व्हावे लागल्याची बाब केंद्र स्तरापासून भाजपच्या जिव्हारी लागली. त्यामुळे भाजपला पुन्हा महाराष्ट्र काबीज करण्यासाठी लोकसभेत कामगिरी करून दाखवावी लागणार असल्याची वस्तुस्थिती आहे.
खासदार संख्या वाढवणे हे एकमेव अस्त्र
भाजपेतर पक्षांसाठीही लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. भाजपला महाराष्ट्रातील सत्ता सोडावी लागल्यानंतर सुरू झालेल्या चौकशा, सहकार क्षेत्रातील वर्चस्व मोडीत काढण्यासाठी होत असलेले प्रयत्न, यामुळे सैरभैर झालेले सत्ताधारी आणि “ईडी’पीडा टाळण्यासाठी निर्माण झालेली आतुरता.
यासाठी दिल्लीत खासदारांची संख्या वाढविणे हे एकमेव अस्त्र वापरता येऊ शकते. त्यामुळे भाजपेतर पक्षांसाठी लोकसभा निवडणूक तितकीच प्रतिष्ठेची होणार असल्याची चर्चा आहे.