पुणे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर राज्यभर त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला गेला. आता भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील शिवरायांचा अपमान करणारी विधान करायला कोश्यारींना लाज वाटत नाही का ? असा सवाल उपस्थित केला आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेत उदयनराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.
शाहू, फुले, नाना पाटील, बाबासाहेब असतील, यांचे स्फूर्ती स्थान महाराज होते आणि हे म्हणतात महाराजांचे विचार जुने झाले. मग आजपर्यंत कोणामुळे पुढे वाटचाल झाली असा सवाल देखील उदयनराजेंनी यावेळी विचारला. त्या त्रिवेदी यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे या लोकांना लाज वाटत नाही? कोण आहेत ही लोकं शिवाजी महाराज यांचे विचार सोडून चालणार नाही नाहीतर देशाचे तुकडे होतील असं स्पष्ट मत यावेळी उदयन राजेंनी व्यक्त केलं.
मी कोष्यारी यांच्या विरोधात नाही पण अशा प्रवृत्तीच्या विरोधात आहे. असच चालू राहिले तर विकृती होईल. शिवाजी महाराज कुठल्या पक्षाचे नव्हते. मी आज परिवाराचा सदस्य म्हणून बोलतो आहे पक्ष वगेरे नंतर बघू. मी राष्ट्रपती आणि नरेंद्र मोदी यांची लवकरच भेट घेणार असल्याचे देखील उदयनराजेंनी यावेळी सांगितले.तसेच पुढच्या वाटचालीबाबत २८ तारखेला भाष्य करणार असल्याचे देखील उदयनराजेंनी यावेळी सांगितले.