वाई -किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आमदार मकरंद पाटील व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचे आक्षेप घेतलेले अर्ज वैध असल्याचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मनोहर माळी यांनी काल रात्री उशिरा जाहीर केला. या दोन्ही बंधुंचे अर्ज शेवटच्या क्षणी वैध ठरल्यामुळे एकूणच निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील या दोघा बंधूंचे अर्ज अवैध ठरल्याच्या अफवेने निवडणुकीआधीच उडालेला राजकीय धुरळा खाली बसला आहे.
आमदार मकरंद पाटील, नितिन पाटील यांच्यासह दोन्ही प्रतिस्पर्धी राजकीय गटातील 241 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तर एकूण 341 अर्जांपैकी 73 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. ऊस उत्पादक गटातून आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांच्या अर्जावर मदन भोसले गटाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. याबाबत आमदारांच्या वकिलांनी सक्षम पुरावा आणि म्हणणे मांडल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा हे अर्ज वैध ठरवले. छाननीमध्ये सोसायटी मतदारसंघातून आमदार पाटील यांचा अर्ज वैध ठरला होता. आता ऊस उत्पादक गटातील अर्जही वैध झाल्याने आमदार कोणत्या गटातील अर्ज ठेवणार हे महत्वाचे व औत्सुक्याचे ठरणार आहे.
ऊस उत्पादकमधून भुईज गटातून 58 अर्ज प्राप्त झाले होते. पैकी 38 अर्ज वैध ठरले तर 20 अर्ज अवैध ठरले. वाई- बावधन- जावळीमधून 30 अर्जांपैकी 24 अर्ज वैध तर 6 अर्ज अवैध ठरले. खंडाळा- कवठे गटातून 49 पैकी 38 अर्ज वैध तर 11 अर्ज अवैध ठरले. सातारा गटातून 57 पैकी 37 अर्ज वैध व 20 अर्ज अवैध ठरले. कोरेगाव गटातून 70 पैकी 36 अर्ज वैध तर 34 अर्ज अवैध ठरल. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून 18 पैकी 14 अर्ज वैध व 4 अर्ज अवैध ठरले. महिला राखीव मधून 21 पैकी सर्व 21 अर्ज वैध झाले. इतर मागास प्रवर्गामधून 16 पैकी 14 अर्ज वैध व 2 अर्ज अवैध ठरले.
विशेष मागास प्रवर्गातील सर्व 13 अर्ज वैध ठरले. उत्पादक संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्थामधून सर्व 6 अर्ज वैध ठरले असून 35 उमेदवारांनी दुबार अर्ज दाखल केलेले आहेत. सत्ताधारी मदन भोसले यांच्या गटाचे जवळपास सर्वच अर्ज वैध ठरले आहेत. 73 उमेदवारांचे अर्ज अवैध झाले असून यामध्ये ऊस उत्पादक गटामधून बाबूराव शिंदे (जावळी), रतन शिंदे (वाई), प्रमोद शिंदे (भुईंज), जयदीप शिंदे (भुईंज), राजेंद्र सोनावणे (भुईंज, संचालक बाजार समिती, वाई), शामराव गाढवे (खंडाळा) यांचा समावेश आहे. यापैकी बाबूराव शिंदे, रतन शिंदे यांचे सोसायटी मतदारसंघातील अर्ज वैध आहेत. अर्ज वैध झालेल्या सर्व उमेदवारांनी तीन दिवसांत पुण्याच्या साखर आयुक्तांकडे आपले म्हणणे सादर करायचे आहे. सलग तीन वर्षे ऊस न गेल्याने व इतर गटांतील सूचक या कारणास्तव अर्ज अवैध करण्यात आले.