माणूस पैशाच्या अभावानं निराश होतो, नोकरी न मिळाल्यानं निराश होतो. अंगात फारसे कसब नसल्यानं नोकरी मिळत नाही. अशीच अवस्था शशीची झाली होती. कलाशाखेची पदवी असूनही, अनेक ठिकाणी खेटे घालूनदेखील बेकार हा शिक्का महिनोन्महिने तो वागवत राहिला. घरीदारी अवहेलना पदरी पडत होती.
एका छोटेखानी कंपनीमध्ये कारकुनाची व्हेकन्सी होती म्हणून तो मुलाखतीसाठी गेला होता. अनेक इच्छुक उमेदवारांसह तो मुलाखतीसाठी बोलावतील म्हणून बाकावर तिष्ठत बसला होता.
मुलाखत झाली. त्याला ज्या गोष्टी येत होत्या त्या न विचारता त्याला जे येत नव्हतं त्याची चाचपणी मुलाखतकारांकडून केली गेली. “कळवतो आम्ही तुम्हाला’ या वाक्यानं त्याची बोळवण केली जाणार याचा अंदाज त्याला येत गेला. या कंपनीत कुणी परिचयाचं आहे का, अशी विचारणा केली गेली तेव्हा ही जागा वशिला असलेल्या उमेदवारासाठी आहे याची त्याला खात्री पटली.
मुलाखतीच्या खोलीतून बाहेर पडण्यापूर्वी थोडासा धीर गोळा करून तो म्हणाला, “साहेब, ही कारकुनाची जागा माझ्यासाठी नाही हे मला समजतंय, पण याव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या जागेसाठी आपण मला अजमावू शकाल का?’
आढ्याकडं पाहात साहेब म्हणाले, “कसं आहे… तुम्ही पदवीधर आहात त्यामुळं एका जागेसाठी आम्ही तुम्हाला कसं विचारणार?’
सारी लाचारी गोळा करत तो म्हणाला, “साहेब, मला नोकरीची खूप गरज आहे. कसली जागा आहे या कंपनीत?’
“सफाई कामगाराची’
“चालेल साहेब’
“ठीक आहे. तू बाहेर बस. सगळ्या उमेदवारांच्या मुलाखती आटोपल्या की बोलावतो तुला.’
हॉल रिकामा झाला. साहेब बाहेर आले. त्यांनी कोपऱ्यातील झाडूकडं नजर टाकली. चाळीस फूट बाय पंचवीस फुटांचा हॉल शशीनी लख्ख केला. न सांगता वॉशरूम भिंतीवर लावलेल्या आरशासारखी चमकदार केली. साहेबांच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. ते म्हणाले, “कारकुनाच्या जागेकरिता आम्ही पंधरा हजार रुपये पगार ठरवला होता. सफाई कामगार म्हणून आम्ही तुला सहा हजार देऊ. चालत असेल तर लगेच नेमणूकपत्र देतो.’ आवंढा गिळत तो “हो’ म्हणाला.
“आता एक काम कर, रिसेप्शनला तुझा ईमेल आय डी दे म्हणजे लगेच तुला पत्र देऊ आणि तू कामाला लाग.’
“साहेब, मी एक साधा गरीब माणूस आहे. माझ्याकडं कुठला आहे कॉम्प्युटर. कॉम्प्युटर नाही तर कुठला आलाय ईमेल आय डी?’
“अरे बापरे, मग आम्ही नाही देऊ शकत नेमणूकपत्र.’
गयावया झाल्या. परिस्थितीचं वर्णन करून झालं. पण त्याचा काही उपयोग न होता शशी बाहेर पडला.
अंधार होता होता तो उगाचच भाजीमंडईपाशी घिरट्या घालत राहिला. एका ओट्यावर एकजण टोमॅटो विकत होता. एका बाईनं चाळीस रुपये देऊन एक किलो टोमॅटो घेतले. त्याने विक्रेत्याला विचारलं, “मला टोमॅटो केव्हढ्याला देशील?’
उत्तर तेच आलं, चाळीस रुपये. निराश होत तो मंडईत रेंगाळत राहिला. रात्रीचे दहा वाजले. मंडई सुनीसुनी झाली. ओट्यावर जेमतेम चार-पाच किलो टोमॅटो उरले होते. शशीचं रेंगाळणं चालूच होतं. विक्रेत्यानं त्याला हाक मारली, “ए इकडं ये. उरलेला सगळं माल घेत असलास तर पंचवीस रुपयांनी देतो.’
शशी पिशवीत चार किलो टोमॅटो घेऊन घरी आला. सकाळी उठून एका सोसायटीत गेला. चार-सहा वेळा जिन्याची चढउतार करून त्याने पस्तीस रुपये किलोनं टोमॅटो विकून पिशवी रिकामी केली.
महिन्याभरात त्याने ही सोसायटी ती सोसायटी करून सगळ्या बाईमाणसांशी परिचय आणि चांगुलपणा वाढवला. आता त्याची रोजची विक्री वीस किलोपर्यंत गेली. सहा महिन्यांनी त्याने आढावा घेतला. त्याची रोजची विक्री पन्नास किलोवर गेली. आता त्याने एक हातगाडी घेतली. होलसेलनं शंभर किलो टोमॅटोबरोबर इतर भाज्यादेखील शशीच्या हातगाडीवर दिसायला लागल्या.
वर्षभरामध्ये शशीने टेम्पो घेतला. चिरलेल्या भाज्या विकणं हा नवा पर्याय त्याला मिळाला. कायमची गिऱ्हाईक आणि होलसेल व्यापारी यांची बांधणी झाली.
दीड वर्षात टेम्पोच्या बरोबरीनं ट्रक घेतला. शशीशेठकडं आता तीन ट्रक आणि चार टेम्पो झाले. भाजीशिवाय इतर उलाढाल सुरू झाली.
एक दिवस शशीशेठकडं एक विमा एजंट आला. “शेठ तुमचा एव्हढा व्यापार आहे. तुमच्यासारख्या उद्योगपतींनी विमा उतरवणं फार गरजेचं आहे.’
विमा एजंटला विन्मुख न पाठवता महिना रुपये वीस हजार हप्ता बसणारा विमा उतरवायचं ठरलं. आवश्यक फॉर्मवर सह्या करत असताना एजंट म्हणाला, “शेठ तुमचा ईमेल आय डी फॉर्मवर टाका ना.’
“अरे बापरे, अहो माझं मेल अकाउंट नाही.’
“मग काढा ना.’
“नाही. मी कधीच मेल अकाउंट काढणार नाही.’
“का शेठ?’
“ते जर माझ्याकडं असतं तर मी झाडू मारत राहिलो असतो म्हणून.’
मेल अकाउंट आणि झाडू हे समीकरण समजावता समजावता शशीशेठचा शशी झाला. घरच्यांची बोलणी खाणारा आणि नैराश्याला नशीब मानणारा.
– दीपक पारखी