कराड – राज्यातील साखर कारखानदार ऊस दर जाहीर करत नसून एक रकमी एफआरपीही देत नाहीत. सरकारही याबाबत काही ठोस पाऊल उचलताना दिसत नसून सरकार व साखर कारखानदार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस दरासाठी दि. 17 व 18 नोव्हेंबर रोजी राज्यभर लाक्षणिक ऊस तोड बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज दिला. शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील व राजू शेळके, उपाध्यक्ष दादासाहेब यादव, तालुकाध्यक्ष प्रमोद जगदाळे, रामचंद्र साळुंखे, ऍड. संदे, सांगली जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, भागवत जाधव उपस्थित होते.
श्री. शेट्टी म्हणाले, “”साखर कारखानदारांनी या गळीत हंगामात उसाला विनाकपात एक रकमी एफआरपी व हंगाम संपल्यानंतर 350 रूपये ऊस उत्पादकांना द्यावेत, या प्रमुख मागणीसाठी संघटनेच्यावतीने आंदोलन पुकारण्यात आले आहे. खते, औषधे, मजुरी यांच्या भाववाढीमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. परंतु, ऊस दर मात्र त्यापटीत वाढत नाही. कृषी मुल्य आयोग एफआरपी ठरवताना या बाबी का लक्षात घेत नाही? हे कळत नाही. ऊसापासून तयार करण्यात येणाऱ्या उपपदार्थांचा नफा शेतकऱ्यांना दिला जात नाही. त्यामुळे उपपदार्थांचा नफा शेतकऱ्यांना मिळावा, अशी आमची मागणी आहे.’
‘ एफआरपी ठरविण्याचे सूत्र नव्याने तयार करायला हवे अशी मागणी कृषी मूल्य आयोगाकडे करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडे याबाबतची शिफारस करणार असल्याचे कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितले आहे, असे त्यांनी सांगितले. “भारत जोडो’ यात्रेबाबत शेट्टी म्हणाले, “राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा चांगली आहे. या यात्रेस मोठा प्रतिसाद मिळत असून तळागाळातील लोकांशी थेट जनसंपर्क होत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनीही अशी पदयात्रा काढावी. त्यामुळे त्यांना देशातील खरी परिस्थिती त्यांना समजेल. त्यांनी जग फिरलं, आता त्यांनी अशी यात्रा काढून देश फिरावा, असा खोचक टोलाही शेट्टी यांनी मोदींना लगावला.