भोपाळ – कोणीही प्रभू श्रीरामाचा भक्त असू शकतो. त्यावर भारतीय जनता पार्टीचे कॉपीराइट नाही असे वक्तव्य मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी केले आहे. त्या म्हणाल्या, भगवान राम आणि हनुमान हे काही भाजपचे कार्यकर्ते नाहीत. जेव्हा भाजपचे अस्तित्व नव्हते, मुघलांचे शासन होते, इंग्रजांचे शासन होते तेव्हाही प्रभू राम आणि हनुमान होते. जर आम्ही भाजपवाले या भ्रमात राहीलो की जेव्हा आमचे डोळे उघडले तेव्हाच सूर्य आणि चंद्र उगवले तर ते आमच्यासाठी विनाशकारक असेल.
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हनुमान मंदिराची उभारणी केली आहे. त्यानिमित्त तेथे पोहोचलेल्या उमा भारती यांनी सांगितले की संपूर्ण हिंदू समुदाय आपला मतदार असेल या भ्रमातही आपण राहता कामा नये. असे होऊ शकत नाही. प्रत्येकाची आपली श्रध्दा असते. जरी आम्ही राम मंदिराची उभारणी केली असली तरी सगळे हिंदू आमचे मतदार आहेत का? जेव्हा लोकशाही व्यवस्था असते तेव्हा तुम्ही कोणती जात, धर्म, कोणाचे मत किंवा कोणा व्यक्तीला आपला बंधक बनवूू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हेच सांगितले आहे.
साध्वी प्रज्ञा यांनी शस्त्रांच्या संदर्भात केलेल्या विधानाबाबत उमा भारती म्हणाल्या शस्त्र बाळगण्याचा परवाना सरकार देते. शस्त्र बाळगणे काही वाईट नाही, मात्र त्यामागची हिंसक भावना वाईट असते. प्रत्येक हिंदू देवी- देवतांनी शस्त्रे धारण केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. एखादी शस्त्र धारण केलेली व्यक्ती अहिंसक असते तर शस्त्र नसलेली व्यक्ती हिंसक असू शकते. आपल्या मनात काय आहे त्यावर हिंसा आणि अहिंसा ठरत असते.