नवी दिल्ली – लोक वेळीच सतर्क झाले नाहीत तर जानेवारीत दिल्लीत करोनाची तिसरी लाट दस्तक देईल असा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. चार महिन्यानंतर दिल्लीत झालेली सर्वात मोठी रुग्णवाढ देशातील इतर राज्यांसाठीही डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आत्ताची रुग्णवाढ पाहता नव्या वर्षात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तिसरी लाट येऊ शकते आणि स्थिती आणखी बिघडू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत त्यावरून अंदाज लावत तज्ज्ञांनी दिल्लीत समूह संसार्गाची सुरूवात झाल्याचे मत व्यक्त केले आहे. ओमायक्रॉनचे असे अनेक रुग्ण आढळून येत आहेत ज्यांची कोणतीहीह ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती. कित्येक रुग्णांना कोणतीही लक्षणे आढळून येत नसल्याने ओमायक्रॉनला रोखणे कठिण असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसात दिल्लीत दरदिवशी एक हजार करोना रुग्ण आढळून येतील असा अंदाही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोकांनी करोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील रुग्णांच्या आकड्यातही पुन्हा वाढ होत आहे. राज्यातही फैलाव वाढल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. प्रशासनाकडून पुन्हा काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत, राज्यात सध्या रात्रीची जमावबंदी लागू केली असून, हॉटेल, रेस्टॉरंट, स्पा, जिम, सिनेमागृहे यांच्या वेळा आणि प्रवेश क्षमतेवरही काही निर्बंध लागू केले आहेत. लग्न संभारंभ, धार्मिक, राजकीय कार्यक्रमातील उपस्थिच्या संख्येवरही मर्यादा आणल्या आहेत.