न्यूयॉर्क – करोनाची लागण होऊन त्यातून बरे झालेल्यांच्या शरीरात अँटिबॉडी तयार झालेल्या असतात हे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. मात्र, या अँटिबॉडी अथवा हे सुरक्षा कवच किती काळ राहते याचा खुलासा झाला नव्हता. त्याबद्दल वेगवेगळे तर्क केले जात होते. मात्र, किमान पाच महिने हे सुरक्षा कवच राहते, असा दावा संशोधकांनी अभ्यासांती केला आहे.
एका शोध निबंधात हा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेच्या माऊंट सिनाई इस्पितळात कार्यरत असलेले या शोधनिबंधाचे लेखक फ्लोरियन क्रेम्मर म्हणाले की, करोनामुक्त झालेल्यांच्या शरीरातील अँटिबॉडी लवकरच नष्ट होतात, असे सांगितले जात होते.
मात्र, आम्ही केलेल्या अभ्यासातून याच्या विरुद्ध गोष्ट आढळून आलेली आहे. ज्यांना सौम्य किंवा नगण्य लक्षणे होती, अशा रुग्णांच्या शरीरात ज्या अँटिबॉडी तयार झाल्या होत्या त्या बराच काळ प्रतिकारशक्तीचे काम मजबुतीने करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
याकरता तब्बल 30 हजार रुग्णांची ते बाधामुक्त झाल्यानंतर तपासणी करण्यात आली होती. त्या लोकांच्या शरीरात अँटिबॉडी आढळून आल्यात. विषाणूला पूर्णत: निष्प्रभ करण्यात त्या सक्षम असल्याचेही त्यावरून सिद्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले.
करोनामुक्तांच्या शरीरातील तब्बल तीन वेळा तपासणी करण्यात आली. यावेळी पहिल्या चाचणीच्या तुलनेत दुसऱ्या चाचणीत अँटिबॉडीचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले. तसेच तिसऱ्या चाचणीच्या वेळी ते आणखी घटले असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून या अँटिबॉडी किमान पाच महिने शरीरात सक्रिय असतात, असे संकेत मिळत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.